श्री काशी श्रेत्राबद्दल प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रचंड आदरभाव आजही टिकून आहे. तिथे काही पुण्यकर्म केले तर मोक्षप्राप्ती होईल असा समज मध्ययुगातही रूढ होता. 


Maratha built bridge in Kashi Uttarpradesh


नाना फडणीसांच्या काळात काशीजवळ कर्मनाशी नदीवर पूल बांधण्याची कल्पना मनात आली. नानांनी आपले कारकून भास्करपंत कुंटे यांना पुलाचे काम सुरु करण्याबद्दल लिहले. पुलाचा पाया खोदण्यास प्रारंभ झाला. परंतु नदीमध्ये वाळूचा भराव आणि पाण्याचा जोर फार होता. पायाभरणीचे काम काही पुरे होईना, त्यामुळे पूर्वीच्या समजुतीप्रमाणे मांत्रिक बोलवून अनुष्ठाने केली. 

ही गोष्ट नाना फडवीसांना कळली तेव्हा ते म्हणाले ,पुलाचे कामास मांत्रिकी अनुष्ठानाचा काहीही उपयोग होणार नाही. अनुष्ठाने बंद करवली आणि 'बेकर' नावाच्या एका युरोपीय कारागिरास २०००० रुपये देऊन पुलाचे काम सोपवले. पुलाच्या पायातील पाणी काढावयास दोन बंब तयार केले. परंतु ते तिथे लागू झाले नाहीत. तेव्हा त्याने कलकत्त्यावरून कळीचे बंब मागवून काम पूर्ण केले. 
आजकालच्या जमान्यात काम Outsource करून पूर्ण करणे ही संकल्पना रूढ होत आहे, परंतु मध्ययुगातही हा प्रकार अनेकदा दिसून येतो. 

संदर्भ : इतिहाससंग्रह : द. बा. पारसनीस
- रोहित पवार 

जेव्हा मराठे काशीत पूल बांधतात...

पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रजांचे राज्य असताना इंग्रजी भाषेचा प्रसार बराच झाला होता. इंग्रजी बोलणारे - ऐकणारे पुष्कळ लोक होते. बाहेरून एखादा अधिकारी आला तर तो साहजिकच इंग्रजीतुनच संबोधत असे. परंतु एक इंग्रज अधिकारी असाही होऊन गेला ज्याने पुण्यात चक्क मराठीत भाषण दिले. 


Marathi Speech by Englishman

ही गोष्ट आहे १८६५ सालची, पुण्यात त्यावेळेसचे गव्हर्नर 'सर बार्टल फ्रिअर' आले होते. एक समारंभ म्हणून त्यांनी अनेकांना आमंत्रित केले होते.त्यावेळी अनेक सरदार व बडे लोक दरबारात जमले होते. 

या सर बार्टल फ्रिअर विषयी सविस्तर परत कधीतरी. पण गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारण्या पूर्वीच म्हणजे १८३५ मधेच या बार्टलने हिंदी, मराठी आणि गुजराती या भाषा शिकून त्याविषयीच्या परीक्षाही पास झाला होता.तर या दरबारात सर्वांना संबोधण्यासाठी ते पुढे आले आणि मराठीतूनच सुरवात करत म्हणाले - 
"आपण येथे आल्याने आम्हास फार संतोष झाला. आपले येण्याने आपले मुलां माणसाचे व आपले रयतेचे कुशळ आम्हास कळले. आपली महाराणी मालिकामा आझम व्हिकटोरिया यांचे ठायी आपली एकनिष्ठ भक्ती असल्याचे कळून आले. या देशातील राज्यकारभार चालवणारे पुष्कळ गृहस्थ आपल्यास भेटले आणि या देशात सौख्य व आबदानी असण्याविषयी आपले महाराणी साहेबांची फार उत्कंठा आहे"

"आपण पुण्याहून परत जाण्यापुर्वी आपल्याशी आपल्या हिताच्या पुष्कळ गोष्टींविषयी संभाषण करण्याची आमची इच्छा आहे. विद्या म्हणजे केवळ लिहता वाचता येणे इतकेच नाही. लिहिता वाचता आल्यावाचुन व्हावे तितके विद्यासंपादन होते असे नाही. पण विद्यासंपादनास आणखीही साधने आहेत. निरनिराळी ठिकाणे पाहणे व तेथील गुणी लोकांशी संभाषण करणे हे एक आहे. कारण विद्वान असे सर्व लोक एकाच ठिकाणी आढळत नाहीत. बॉम्बे, अहमदाबाद, काशी अशी दुसरी शहरे पुष्कळ माहिती होण्यासारखी आहेत"

"दूरदेश पाहण्यास जावे तर खर्च लागतो परंतु आपले बरोबर जरूर तितकेच लोक घेऊन जाण्याविषयी आलिजा बहादूर शिंदे महाराज व होळकर महाराज यांचा उत्तम कित्ता आपण घेण्यासारखा आहे"

"पहा जर कदाचित आपल्या महाराणी साहेबांचे चिरंजीवांपैकी एकाची स्वारी येथे आली तर त्याजबरोबर त्यांचे भाषेने संभाषण करता येईल असे आपल्यामध्ये तयार असले पाहिजेत"

मी तुमच्याशी येथे अगदी साधेपणाने आणि सत्य तेच बोललो, अगदी जुन्या मित्राप्रमाणे बोललो कारण गेले अनेक वर्ष मी या देशासाठी अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. ब्रिटिश सरकार तुमची काळजी घेण्यास बांधील आहे. धन्यवाद. 


 

हे सर्व काही बोलून झाल्यावर , श्रीनिवास रावसाहेब पंतप्रतिनिधी उभे राहिले आणि या सर्व मराठ्मोठ्या भाषणाबद्दल त्यांनी बार्टर फ्रिअर यांचे आभार मानले.

दिनांक : ४ सप्टेंबर १८६५
----------------------------------
संदर्भ :
1) The Speeches and Addresses of Sir H.B.E. Frere - BalKrishna Pitale
2) पुणे शहराचा पेशवाई नंतरचा इतिहास

- रोहित पवार 

मराठीत भाषण देणारा इंग्रज


२०१७ साली कामानिमित्त लंडनला जाणे झाले. इतिहासाचा विद्यार्थी असल्याने पावलं म्युझिअम कडे वळणार होतीच. इथे व्हिक्टोरिया अल्बर्ट या अतिशय प्रसिद्ध अशा वास्तुसंग्रहालयाला भेट दिली . इथे ज्या काचेच्या कपाटात छत्रपती शिवरायांची वाघनखं ठेवली आहेत तिथेच ठेवली आहे आणखी एक महत्वाची वस्तू - औरंगजेबची तलवार.

Aurangzeb's Sword



इस १६८० सालची स्टीलचं पातं असलेली ही सुंदर तलवार सोन्याच्या जाडसर नक्षीने मढवली असून त्यावर फारसी लिखाणही आढळते. त्यावर 'आलमगीर पादशाह २४ या रहमान या रहीम '' असे लिहले असून २४ हा आकडा त्याचा इस १६८० (हिजरी सन १०९१) सालातील औरंगजेबचा शासनकाळ दर्शवतो असा तर्क मांडला गेला आहे.

Aurangzeb's Sword

Aurangzeb's Sword


सदर तलवारीच्या पात्यांचे नक्षीकाम पाहता सतराव्या शतकातील सुप्रसिद्ध तालवारींचा निर्माता असादुल्लाह इसफाहानी याने ही तलवार बनवली असल्याचे मानले जाते. फिल्ड मार्शल अर्ल किचनर यांच्या कलेक्शन मध्ये असलेली ही तलवार पुढे १९६४ साली या संग्रहालयात आणली गेली.

- रोहित पवार

लंडनमधील औरंगजेबची तलवार

मराठा स्वराज्याचे सरखेल, आरमार प्रमुख 'कान्होजी आंग्रे' यांनी परकीय सत्तांना शह देत समुद्रावर सत्ता गाजवली.  काही वर्षांपूर्वी मराठ्यांच्या लहान बोटींना नावं ठेवणारे इंग्रज पुढच्या काळात मराठ्यांसारखी जहाजे आपल्याकडे  असायला हवीत असं म्हणायला लागले. यातच मराठ्यांच्या आरमाराचे यश दिसून येते. 





या कान्होजी आंग्र्यांवर   इंग्रज गव्हर्नर फिप्सने चाचेगिरीचा (pirates) आरोप केला, यावर कान्होजी आंग्रे यांनी अगदी समर्पक असे प्रत्युतर दिले ते वाचण्यासारखे आहे . 


" दुसऱ्याच्या मालकीची वस्तु आपल्या अधीन करुन घेण्याच्या बाबतीत म्हणायचे तर, असल्या महत्वकांक्षा आपणासारख्या व्यापार्यांनी बाळगल्या नाहित का? जगाचा शिरस्ताच आहे, परमेश्वर स्वतःचे असे काहिच देत नसतो. तो एकाचे काढून दूसर्याला देतो. परमेश्वराची ही कृती चांगली कि वाईट हे कोण ठरवनार ? एक विविक्षित राजसत्ता ही हिंसा, अपमान आणि चाचेगिरी (piracy) याच्यावर चालली आहे असे म्हणणे तुमच्यासारख्या व्यापार्यांना आजिबात शोभत नाही. व चार पातशाह्यांशी झुंज देऊन  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले तेव्हा याच गोष्टीचा त्यांनी अवलंब केला. आम्ही त्याच पद्धतीने सत्तेवर आहोत. खरेखोटे मानो अथवा न मानो  त्यामुळेच आम्ही टिकून आहोत." 


संदर्भ : दर्याराज कान्होजी आंग्रे - सदाशिव शिवदे

मुळ संदर्भ :  Consultation Bombay Castle 7th august 1724


- रोहित पवार 

आंग्र्यांचे इंग्रजाना उत्तर

 अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत 'श्रीगणेश' आणि त्याचा परंपरेनुसार होणारा उत्सव हा खरंतर साजरा करण्यासोबतच तो अभ्यासाचाही विषय आहे. नानासाहेब खासगीवाले, भाऊसाहेब रंगारी, दगडुशेठ हलवाई या मान्यवरांच्या पुढाकारातुन आणि लोकमान्य टिळकांच्या पुरस्कारातून पुण्यातुन या उत्सवाला १८९३ साली सुरवात झाली.






आजच्या काळात गणेश मंडळांमधे आकर्षण असते ते प्रकाश व्यवस्था आणि हलत्या देखाव्यांबद्दल. परंतु त्याकाळात 'व्याख्यान' हा आकर्षणाचा विषय असे. स्वातंत्र्य चळवळीत लोकांचा सहभाग आणि जनजागृती हा त्यामागे मुळ हेतु होता. यात टिळक, त्यांचे सहकारी तसेच काही मुस्लिम व्याख्यातेही ठिकठिकाणी सहभाग घेत असत.

याकाळातही अनंत चतुर्दशीला मोठया उत्साहात मिरवणुक निघत असे. १८९४ च्या मिरवणुकीचा तपशिल केसरी वृत्तपत्रात सापडतो. मंडळांची संख्या वाढल्याने मिरवणुकीत मान कसा असेल याचा निर्णय टिळक आणि आन्नासाहेब पटवर्धन यांनी घेतला. आघाड़ीवर ग्रामदैवत कसबा, दूसरा तांबडी जोगेश्वरी त्यामागे क्रमांकाप्रमाणे आणि शेवटून तिसरा भाऊसाहेब रंगारी , शेवटून दूसरा दगडूशेठ हलवाई आणि शेवटी मंडईकरांचा अशी भव्य रांग लागत असे. रस्ते दुतर्फा लोक़ांनी फूललेले असत.

मिरवणुक सुरळीत पार पडावी यासाठी काशीनाथ जाधव , कृष्णशास्त्री कवडे यांच्यावर जबाबदारी होती . पुढे हे व्यवस्थापन करण्यासाठी १९०८ साली 'गणेश मंडळाची' स्थापना करण्यात आली.

इतिहास संशोधक आणि मोड़ी जाणकार मंदार लवाटे यांच्या 'पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षाचा' या पुस्तकात गणेशोत्सव मिरवणुकींचा १८९३ पासुन २०१३ पर्यंतचा सर्व प्रवास दिला आहे. वरील सर्व तपशील ससंदर्भ दिले गेले आहेत. त्यासोबतच अनेक दुर्मीळ छायाचित्रांचा देखिल समावेश करण्यात आला असून वाचनीय पुस्तक म्हणुन दखल घेतली पाहिजे.

संदर्भ : पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षाचा - मंदार लवाटे
चित्र १ : भाऊसाहेब रंगारी मंडळ मिरवणुक वर्ष १९११
चित्र २ : मुखपृष्ठ - पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षाचा

गणपती मिरवणुकीचा इतिहास


एखाद्या कार्यात दुसऱ्याच्या सोबतीने पुढे जाताना महत्वाचा असतो तो 'विश्वास' . दुसऱ्याच्या मनात काही काळंबेरं असेल तर त्याचा फटका दोघांनाही बसणार,अशा वेळी एकमेकांवरचा विश्वास दृढ व्हावा यासाठी तुळशीपत्र - बेलबंढारा देऊन 'बंधुत्वाची शपथ' घेतली जाई.





महादजी शिंदे आणि नाना फडणवीस , दोघेही मराठ्यांच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या व्यक्ती. महादजी उत्तरेत रण गाजवत तर नाना फडवणीस पुण्यात फडावर व्यवस्थापनाचं काम करत. त्यामुळे काही वाद -विवाद होणे स्वाभाविक होते.पण दोघांमध्ये काही वितुष्ट येऊन मराठा साम्राज्याचे नुकसान होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतलेली दिसते

१५ मार्च १७७९ रोजीच्या पत्रातला हा उल्लेख पहा, महादजी लिहतात :  

सरदारी माझी - फडनवीशी त्याची (नानाची), बंधुत्वाप्रमाणे वर्तन करू, ज्यात सरदारीचे कल्याण ते संधान चालवू, जो अनिष्ट चिंतील त्याचे पारिपत्य करू. आम्ही बेलबंढारा पाठवला आहे. आपण बंधुत्वाविषयी संशय न मानावा. आपण आहा तेथे मी आहे.

संदर्भ : ऐतिहासिक पत्रबोध - सरदेसाई, लेखांक ५४

- रोहित पवार

शपथक्रिया - महादजी आणि नाना


इस १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. या लुटीत अगणित द्रव्य महाराजांना लाभले. दुसरीकडे या घटनेने औरंगजेबाचा तिळपापड उडाला होता. खरंतर सुरतेतून मिळणारं उत्पन्न औरंगजेबाच्या बहिणीला (जहांआरा बेगम) मिळण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती. त्याकाळी सुरत व्यापाराची राजधानी होती परंतु शिवाजी महाराजांच्या दणक्याने अनेक व्यापारी सुरत सोडून चालले होते.




यावर तोडगा म्हणून औरंगजेबाने मोठ्या उदारपणे एक वर्षभर इंग्रजांना व इतर सर्व व्यापाऱ्यांना जकात माफ करण्याचा हुकुम काढला. एवढेच नाही तर पुढेही एक चतुर्थांश जकात दरसाल माफ होईल असे संकेत दिले. (बंगालला लिहलेल्या ३० एप्रिल १६६४ च्या पत्रात "आपल्या शहरांतील व्यापाऱ्यांना उत्तेजन मिळावे व झालेल्या नुकसानीची भरपाई व्हावी म्हणून एक वर्षाच्या जकाती औरंगजेबाने माफ केल्या असे लिहले आहे")


संदर्भ - शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ लेखांक ९८७

सुरत लुटीचे डॅमेज कंट्रोल