जावळीचे मोरे प्रकरण-पूर्वार्ध


सातारा जिल्ह्यात प्रतापगड सोडल्यावर महाबळेश्वरकडे जाताना साधारण ३-४ किमी डावीकडे जावळीच्या मोरे घराण्याचे कुळ आहे. हे जावळीचं बेलाग खोरं  इतकं अवघड आणि अभेद्य की, १४व्या शतकात ५००० मुसलमानी फौजा जावळीत गेल्या , त्या परतल्याच नाहीत आणि त्याचं काय झालं याचा ठाव ठिकाण देखील लागला नाही.अशी हि जावळी प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी अशी कोणाची हिम्मत नव्हती.चंद्रराव हे विजापुरकरांचे (आदिलशहा) पिढीजात जहागीरदार होत.

Jawali More and Shivaji Maharaj
जावळीचे खोरे
 मोरे घराणे :
जावळीच्या संस्थानची स्थापना करण्याऱ्या मूळ व्यक्तीचे नाव 'चंद्रराव' असे होते. या चंद्ररावला ६ मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वत:जवळ ठेवले आणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमून दिल्या. थोरल्या शाखेत चंद्रारावापासून पुढील ८ पिढ्या झाल्या. चंद्रराव - चयाजी - भिकाजी - शोदाजी - येसाजी - गोंदाजी - बाळाजी - दौलतराव. जावळीचा  हा प्रत्येक शाखापुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला.

या शाखेतला आठवा पुरुष दौलतराव निपुत्रिक होता, म्हणून त्याची आई माणकाई हिने कृष्णाजी बाजी यास दत्तक घेतले आणि जावळीच्या गादीवर बसवले. वास्तविक दत्तक घेतलेल्या चंद्ररावाचे नाव 'येसाजी' होते हे २२ डिसेंबर १६५७ सालच्या एका महजरावरून दिसून येते.  महजरातील या उल्लेखाचा शिवभारत व मोऱ्यांची बखर याच्याशी मेळ घातला की , कृष्णाजी व बाजी हे त्याचे मुलगे होते असे अनुमान निघते. या दत्तक प्रकरणा दरम्यान काही कारणास्तव आदिलशाहीकडून मदत न घेता माणकाईने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले.

या चंद्ररावाला जे भाऊबंद होते त्यापैकी प्रतापराव,यशवंतराव (कसबे शिवथर), हणमंतराव (जोर), दौलतराव (महिपतगड), गोविंदराव (जांभळी), कोंढवी परगण्यातील केवनाळे व वाकण येथील बागराव ऊर्फ भिकाजीराव, आटेगाव तरफेतील देवळी येथील सूर्यराव .

वाई परगण्यातील बावधन या गावच्या गोमाजी नरसिंह व रामजी कृष्ण या दोन अधिकाऱ्यांनी चंद्ररावाला पाठविलेले पत्र उपलब्ध आहे. या पत्राच्या सारांशानुसार 'चंद्रराव' येसाजीचे गादीवर येणे ही घटना १८ जून १६४६ नंतर घडली आहे असा निष्कर्ष निघतो. चंद्ररावाला गादीवर बसवण्यात शिवाजी महाराजांची मदत झाली.पुढे ..१६४८ मध्ये स्वराज्यावर चालून आलेल्या फतहखानच्या स्वारीपूर्वी महाराजांनी आपल्या मावळ्यांना उद्देशून एक भाष्य केल्याचे शिवभारतात सांगितले आहे (अध्याय १३). त्यात  त्यांनी म्हटले आहे की,

"लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली जावळी मी पूर्वी घेतली आणि तिचा अभिलाष करणाऱ्या चंद्रारावाची तिथे स्थापना केली." 

याचाच अर्थ ,येसाजीला(चंद्रराव) दत्तक घेताना आदिलशाहकडून संमती घेतली गेली नव्हती. त्यामुळे आदिलशाह नाराज होणे स्वाभाविकच होते. त्यातच भर म्हणून इ.स.१६४९ च्या काही दिवस आधी चंद्ररावचा चुलत भाऊ हणमंतरावने जोर खोरे घेतले. हा भाग अफजलखानकडे (आदिलशाही सुभेदार) असलेल्या वाई परगण्यातला होता. त्या प्रसंगी अफझलखान याने कान्होजी जेध्यांना पत्र पाठवले होत.

चंद्रराऊ कदीम मयत जालियावरी (जावळी) गैरी लोकी पैस करून बळकाविले  आहे. याबद्दल त्यावरी नामजादी केली आहे" - अफजलखान

 याचा अर्थ असा की, कदीम (पूर्वीचा) चंद्रराव मरण पावल्यावर जावळी गैरी लोकी  पैस करून (घुसखोरी करून) बळकाविले आहे व म्हणून त्यांच्याविरुद्ध नामजादी केली आहे. (नेमलेले आहे) वरील उताऱ्यावरून, 'गैरी लोक' या शब्दांनी चंद्रराव येसाजी व त्याचे साथीदार अभिप्रेत असावेत. येसाजीची जावळीच्या गादीवरील स्थापना आदिलशहाच्या परवानगीशिवाय झालेली होती हेच अफझलखानाच्या जावळीवरील स्वारीचे कारण होते. परंतु काही कारणास्तव ही स्वारी सुरु होण्याआधीच संपली.

पुढे शिवाजीराजे आणि चंद्रराव यांत वाद होत गेले आणि शिवाजी महाराजांना जावळीवर स्वारी करणे भाग पडले याबद्दल उत्तरार्ध मध्ये सविस्तर लिहले आहे.

|| लेखनसीमा ||
  रोहित पवार


संदर्भ :
मोरे बखर (ऐतिहासिक बखरी खंड २) | संपादक : अविनाश सोवनी
श्री राजा शिवछत्रपती -   गजानन भास्कर मेहेंदळे
शिवाजी आणि चंद्रराव मोरे - वैद्य चिंतामण विनायक 
परमानंदकृत शिवभारत - संपादक : स.म.दिवेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा