shivaji maharaj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
shivaji maharaj लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


२०१७ साली कामानिमित्त लंडनला जाणे झाले. इतिहासाचा विद्यार्थी असल्याने पावलं म्युझिअम कडे वळणार होतीच. इथे व्हिक्टोरिया अल्बर्ट या अतिशय प्रसिद्ध अशा वास्तुसंग्रहालयाला भेट दिली . इथे ज्या काचेच्या कपाटात छत्रपती शिवरायांची वाघनखं ठेवली आहेत तिथेच ठेवली आहे आणखी एक महत्वाची वस्तू - औरंगजेबची तलवार.

Aurangzeb's Sword



इस १६८० सालची स्टीलचं पातं असलेली ही सुंदर तलवार सोन्याच्या जाडसर नक्षीने मढवली असून त्यावर फारसी लिखाणही आढळते. त्यावर 'आलमगीर पादशाह २४ या रहमान या रहीम '' असे लिहले असून २४ हा आकडा त्याचा इस १६८० (हिजरी सन १०९१) सालातील औरंगजेबचा शासनकाळ दर्शवतो असा तर्क मांडला गेला आहे.

Aurangzeb's Sword

Aurangzeb's Sword


सदर तलवारीच्या पात्यांचे नक्षीकाम पाहता सतराव्या शतकातील सुप्रसिद्ध तालवारींचा निर्माता असादुल्लाह इसफाहानी याने ही तलवार बनवली असल्याचे मानले जाते. फिल्ड मार्शल अर्ल किचनर यांच्या कलेक्शन मध्ये असलेली ही तलवार पुढे १९६४ साली या संग्रहालयात आणली गेली.

- रोहित पवार

लंडनमधील औरंगजेबची तलवार

मराठा स्वराज्याचे सरखेल, आरमार प्रमुख 'कान्होजी आंग्रे' यांनी परकीय सत्तांना शह देत समुद्रावर सत्ता गाजवली.  काही वर्षांपूर्वी मराठ्यांच्या लहान बोटींना नावं ठेवणारे इंग्रज पुढच्या काळात मराठ्यांसारखी जहाजे आपल्याकडे  असायला हवीत असं म्हणायला लागले. यातच मराठ्यांच्या आरमाराचे यश दिसून येते. 





या कान्होजी आंग्र्यांवर   इंग्रज गव्हर्नर फिप्सने चाचेगिरीचा (pirates) आरोप केला, यावर कान्होजी आंग्रे यांनी अगदी समर्पक असे प्रत्युतर दिले ते वाचण्यासारखे आहे . 


" दुसऱ्याच्या मालकीची वस्तु आपल्या अधीन करुन घेण्याच्या बाबतीत म्हणायचे तर, असल्या महत्वकांक्षा आपणासारख्या व्यापार्यांनी बाळगल्या नाहित का? जगाचा शिरस्ताच आहे, परमेश्वर स्वतःचे असे काहिच देत नसतो. तो एकाचे काढून दूसर्याला देतो. परमेश्वराची ही कृती चांगली कि वाईट हे कोण ठरवनार ? एक विविक्षित राजसत्ता ही हिंसा, अपमान आणि चाचेगिरी (piracy) याच्यावर चालली आहे असे म्हणणे तुमच्यासारख्या व्यापार्यांना आजिबात शोभत नाही. व चार पातशाह्यांशी झुंज देऊन  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले तेव्हा याच गोष्टीचा त्यांनी अवलंब केला. आम्ही त्याच पद्धतीने सत्तेवर आहोत. खरेखोटे मानो अथवा न मानो  त्यामुळेच आम्ही टिकून आहोत." 


संदर्भ : दर्याराज कान्होजी आंग्रे - सदाशिव शिवदे

मुळ संदर्भ :  Consultation Bombay Castle 7th august 1724


- रोहित पवार 

आंग्र्यांचे इंग्रजाना उत्तर


शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत रोमांचक प्रसंग म्हणजे 'आग्रा भेट'. शिवाजी महाराजांचे विश्वसनीय आणि समकालीन चरित्र म्हणजे 'शिवभारत' आणि या ग्रंथाचे रचयिते 'कवींद्र परमानंद' हे आग्रा प्रकरणात उपस्थित असल्याची राजस्थानी पत्रव्यवहारात नोंद आढळते.

त्या 'डिंगल' भाषेतील पत्राचा मराठी अनुवाद असा - "शिवाजीराजांसोबत त्यांचा एक कवी आहे 'कवींद्र कवीश्वर' ,शिवाजीराजांनी त्याला एक हत्ती , एक हत्तीण , एक हजार रुपये रोख, एक घोडा आणि पोशाख दिला. यासोबतच शिवाजीराजांनी अजून एक हत्ती देण्याचे वचन त्याला दिले आहे आणि ते वचन लवकरच पूर्ण करतील."
---------------------------
"Shivaji has a poet entitled 'kavindra kavishwar', to whom he gave male elephant, female elephant, one thousand rupees in cash, a horse & full suit. He promised to give one more elephant to the poet & he is going to give it."

‪#‎Reference‬ - Shivaji's visit to aurangzib at agra, letter 28
---------------------------
या पुस्तकाचा परिचय जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - 


‪शिवभारतकार परमानंद आणि आग्रा भेट‬

शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर यादिवशी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला.या दिवसाची आठवण म्हणून अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ठीकठिकाणी साजरा केला जातो. आज ३५० वर्षाहूनही अधिक काळ उलटला तरी 'छत्रपती शिवाजी महाराज' ह्या नावाचं गारुड महाराष्ट्रातल्या कानाककोपऱ्यात प्रत्येक माणसावर संस्कार करत आलंय.परंतु या राज्याभिषेकाचे प्रयोजन काय होते हे समजून घेण्यासाठी त्यांच्या कार्याचे स्वरूप आणि त्यामागील प्रेरणा समजून घेणे आवश्यक आहे.


शिवपूर्वकाळात हिंदुस्थानात यावनी सत्ता अधिराज्य गाजवत होत्याउत्तरेत मुघल तर दक्षिणेत आदिलशहा आणि कुतुबशहा अशा बलशाली सत्ता राज्य करत होत्याया सत्तांचे स्वरूप हे प्रामुख्याने 'लष्करीहोते त्यामुळे स्थानिकांमधे या सत्ताधीशांविषयी असंतोषाची भावना होतीअशातच एका जहागीरदाचा पुत्र या अन्य्याया विरुद्ध बंड उगारतो आणि स्थानिकांमधे 'स्व'राज्याची भावना निर्माण करतो हि गोष्ट प्रवाहाविरुद्धच होतीराज्याभिषेकाची भावना व्यक्त करताना बखरकार लिहतो कि"राजे सिंहासनारूढ झाले , ह्या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशहा मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपती जाला ही गोष्ट सामान्य जाली नाही"राज्याभिषेकाचे महत्व सांगताना जेष्ठ इतिहास संशोधक 'वा.सीबेंद्रेआपल्या 'श्रीशिवराजाभिषेकग्रंथात लिहतात किछत्रसिंहासनाच्या धर्मसिद्ध प्रतिष्ठेने हिंदवी राज्यसंस्थेला सांस्कृतिकराजकीय आणि सामाजिक श्रेष्ठ दर्जा व स्थैर्य प्राप्त होण्याचे उद्दिष्ट या राज्याभिषेकामागे होते "


राज्याभिषेक हा एक संस्कार आहे, तो आवश्यक आहेच परंतु केवळ राज्याभिषेक हि स्वराज्याची फलश्रुती नव्हे. अॅबे कॅरे हा फ्रेंच प्रवासी शिवकाळात हिंदुस्थानात येऊन गेला. चौल बंदरानजीक त्याचे एका मराठा अधिकाऱ्याशी जे संभाषण झाले ते त्याने त्याच्या प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे. तो मराठा अधिकारी सांगतो कि, "सिंधु नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश काबीज करावयाची शिवरायांची मनिषा आहे" . हे होतं शिवाजी महाराजांचं स्वप्न जे पुढे नानासाहेब पेशव्यांनी पूर्ण केले. पूर्वेकडील देशांत शिवाजी महाराज सर्वात महान राजे असून त्यांच्या गुणवत्तेची तुलना स्वीडनचा महान राजा 'गुस्तावस एडोल्फस' शी करावी लागेल असे कॅरे लिहतो. याशिवाय समकालिन पोर्तुगीज आणि इंग्रजांचा पत्रव्यवहार पाहिल्यास शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर, ज्युलिअस सीझर या महान सेनानींशी केल्याचे आढळते.

वेदमूर्ती गागाभट्टांनी शिवाजीरायांच्या मस्तकी सार्वभौमत्वाच्या धारा धरल्या. छत्र घारण करणे, नाणी पाडणे आणि नवीन शक सुरु करणे ही सार्वभौमत्वाची तीनही चिन्हे महाराजांनी अमलात आणली.
राज्याभिषेकावेळी राज्यव्यवस्थेत महत्वाचे बदल करण्यात आले. याची सुरवात केली ती भाषा शुद्धीकरणा पासून .शिवरायांनी शब्दकोश (dictionary) तयार केला हे फार कमी लोकांना माहित असेल. ३०० वर्ष यावनी राजवटीखाली स्थानिकांवर, राज्यव्यवहारात फारसी-दक्खनी भाषेचा प्रभाव पडलेला होता.यावर उपाय म्हणुन फारसी-दक्खनी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द शोधुन त्याचा एक कोश तयार करावयाची योजना शिवाजी महाराजांनी आखली. 'रघुनाथपंत हणमंते' यांना दरबारात बोलावुन राज्यव्यवहारकोश प्रकल्पाचे काम सोपवले. ठरल्यानुसार इ.. १६७६-७७ दरम्यान हा कोश निर्माण झाला. अशा कोशाची निर्मिती करणारे शिवराय हे पहिले कोशकार ठरतात.शिवरायांच स्वप्न आणि त्याचं वेगळेपण यातूनच दिसून येते.


राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी एका महत्वाकांक्षी मोहिमेला प्रारंभ केला तो म्हणजे 'दक्षिण दिग्विजय' .यावेळी चेन्नईच्या दक्षिण भागातील 'जिंजी' हा महत्त्वाचा किल्ला महाराजांनी स्वराज्यात आणला. जिंजी ते रायगड या परतीच्या प्रवासात 'समोत्तिपेरूमल' देवालया नजीक महाराजांचा मुक्काम होता. बहमनी सत्तांनी उध्वस्त केलेल्या या मंदिराची पुनर्प्रतिष्ठापना शिवाजीराजांनी केली. याठिकाणी त्रिपुरी पौर्णिमेस भव्य दीपोत्सवाची प्रथा महाराजांनी पुन्हा सुरु केली जी दीर्घकाळ बंद पडली होती. हा दीपोत्सव आजही साजरा केला जातो. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघी दक्षिण काबीज करायला निघालेल्या औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केले. यावेळी जिंजीच्या किल्ल्याने शिवपुत्र राजाराम महाराजांना तब्बल ८ वर्षे आश्रय दिला. शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयाची हि फलश्रुतीच म्हणावी लागेल.

स्त्रीचा बदअमल केला म्हणून रांझ्याच्या पाटलाला तडक चौरंगाची शिक्षा सुनावणारे शिवराय , जिवाजीपंताने कामात दिरंगाई केल्यावर ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केली जाणार नाही असे खडसावणारे शिवराय, रयतेच्या पिकाच्या देठासही धक्का लावू नका अशी सैन्यास तंबी देणारेही शिवराय. अशा अनेक विविध पैलूंनी नटलेले शिवाजी महाराजांचे चरित्र अद्वितीयच आहे. परंतु आज शिवचरित्रातुन प्रेरणा घेण्यापेक्षा समाजात जातीभेद पेरला जातोय, दुर्गसंवर्धनापेक्षा पुतळ्यांना महत्व दिले जाते , सोशल मिडियावर मांडला जाणारा इतिहास शहानिशा न करता खरा मानला जातो, हि खरी शोकांतिका. आज आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतीय अस्मितेचा जागर जिद्दीने केला जातोय मग तीनशे वर्षापूर्वी राज्याभिषेकाच्या निमित्ताने अस्मितेचे अग्निपुष्प फुलले त्याची आठवण आजच्या दिवशी करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

बहुत काय लिहावे
- रोहित पवार

शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने...


इसवी सनाच्या सातव्या शतकात परकीय शक्तींचे भारतात आगमन झाले. यामध्ये प्रामुख्याने अरब आले, नंतर तुर्क, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज आले. बाराव्या शतकात 'अल्लाउद्दिन खिल्जी' याने महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांचा गरुडध्वज उध्वस्त केला, त्यामुळे पुढची सुमारे ३०० वर्ष यावनी राजवटींखाली जनता भरडून निघाली. यादरम्यान फार्शी शब्दांचा वापर मराठी भाषेत होऊ लागला. मराठी भाषेत फ़ार्सी शब्दांचा सुळसुळात झालेला होता. मुळ संस्कृतप्रचुर भाषा विलयास चालली होती. 

सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेश आणि संस्कृती रक्षणार्थ महाराष्ट्र राज्याची स्थापना केली.परंतु शिवकाळातही दैनंदिन व्यवहारात फारसी-दक्खनी भाषेचा प्रभाव पडलेला होता. लोकांनीतर आपल्या मुलांची नावेसुद्धा रुस्तुमराव, सुल्तानराव ठेवायला सूरवात केली होती. यावर उपाय म्हणुन राज्यव्यवहारात आढळुन येणार्या फारसी-दक्खनी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द शोधुन त्याचा एक कोश तयार करावयाची योजना शिवाजी महाराजांनी आखली. 

राज्यव्यवहार कोश सुपूर्द करतानाचे काल्पनिक चित्र , सौजन्य - पराग घळसासी


इ.स १६७४ साली हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना करणारा मंगल सोहळा पार पडला,शिवरायांचा राज्याभिषेक झाला. यानंतर त्यांनी 'रघुनाथपंत हणमंते' यांना दरबारात बोलावुन राज्यव्यवहारकोश प्रकल्पाचे काम सोपवले. यापुर्वी म्हणजे इस १६६५ साली पुरंदरतहा दरम्यान रघुनाथपंत हणमंते यांना शिवाजीराजांनी 'पंडितराव' हा किताब दिला होता. योजना ठरल्यानुसार इ.स. १६७६-७७ दरम्यान हा कोश निर्माण झाला. रघुनाथपंत दक्षिणदिग्विजय मोहिमेत गुंतले असल्याने त्यांनी हे काम आपला हस्तक 'धुंडीराज लक्ष्मण व्यास' याकड़े सोपवले. 

शिवाजी राजांनी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करण्यासाठी दिलेली आज्ञा आणि त्याबद्दलचा राज्यव्यवहारकोश मधील उपोद्घात आलेला उल्लेख असा, 
कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थं यवनवचनैर्लुप्तसरणिम् |
नृपव्याहार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्
नियोक्तोभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ||

अर्थ - या पृथ्वीतलावरून म्लेंच्छांचा पूर्ण उच्छद केल्यानंतर सूर्यवंशाला ललाभूत ठरलेल्या त्या छत्रपती शिवाजी राजांनी यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राजव्यवहार पध्दतीचा संस्कृत भाषेतून प्रसार करण्यासाठी (रघुनाथ) पंडिताची नियुक्ती केली.

'द ग्रेट मुघल' या ग्रंथाचा लेखक अर्ली इब्राहीम लिहतो कि, A Significant aspect of Shivaji's rule was his attempt to revive ancient Hindu political tradition and court conventions to introduce Marathi in place of Persian as the court language. He revived Sanskrit administrative nomenclature and compiled a dictionary of official terms- the Rajya Vyavhar Kosh - to facilitate the change over.

सुमारे १३०० पेक्षा अधिक शब्दांचा एक कोश तयार झाला. राज्यव्यवहार कोशाच्या दहा सर्गात १३८० फार्सी- दख्खनी उर्दू शब्द आले असून, त्यांच्या पर्यायी संस्कृत प्राकृत शब्द सुचविले आहेत. उदा. गुलाम-दास, चोपदार-दण्डधर, चाकर-सेवक , गरम-उष्ण. आपली मराठी संस्कृती जपली जावी या उद्देशाने शिवाजी महाराजांनी हा कोश रचला, तसेच यादरम्यान 'शिवाकौदर्य' आणि 'करणकौस्तुभ' असे संस्कृत ग्रंथ देखील लिहून घेतले. राज्यव्यवहारकोशाची निर्मिती करणारे शिवराय हे पहिले कोशकार ठरतात. शिवरायांच स्वप्न आणि त्याचं वेगळेपण यातून दिसून येते.


-रोहित पवार


संदर्भ: 
राज्यव्यवहारकोश - संपादक : अ.दा. मराठे
स्वधर्म - निनाद बेडेकर
The Great Mughal- Arlie Embrahim
चित्र सौजन्य - पराग घळसासी


शिवरायांचा एक अपरिचित प्रकल्प



 कालगणना हि सूर्य किंवा चंद्रावर आधारित असते. अगदी पुरातन काळापासून भारतात चांद्रमास आणि सौरवर्षावर आधारित हिंदू कालगणनेचा वापर भारतात होत आला आहे. जगभारत अनेक संस्कृती उदयास आल्या आणि कालगणना निश्चिती करण्यासाठी आपापल्या सोयीनुसार प्रत्येक संस्कृतीने कालनिर्णय ठरवला. इसवीसनपूर्व काळात रोमन साम्राज्य अस्तित्वात होते, त्यांनी वर्षाचे ३५५ दिवस कॅलेंडर वापरात आणन्यास सुरवात केली. हे कॅलेंडर देखील चांद्रमासावर आधारित होते.परंतु एका सौरवर्षात ३६५ दिवस असतात हे रोमन लोकांना परिचित होते. त्यावेळी प्रत्येक वर्षी १० दिवसांचा फरक पडत होता. त्यामुळे हा फरक भरून काढण्यासाठी रोमन लोकांनी दर तीन वर्षांनी एक अधिक मास (३० दिवस) घेतला. परंतु हे करूनसुद्धा भौगोलिकरित्या हा समतोल साधण्यात बराच गोंधळ उडाला.  आणि म्हणूनच यातून मार्ग काढण्यासाठी 'ज्युलिअस सीझरने' पूर्वीच्या कालगणनेत महत्वाचे फेरबदल करून इसवीसनपूर्व ४६ साली सुधारणेचा एक हुकूमनामा काढला. यालाच ज्युलियन कॅलेंडर म्हणतात. 



 आता यात नेमके काय बदल केले ते पाहूयात, पृथ्वीला सूर्याभोवती भ्रमण पूर्ण करण्यासाठी ३६५.२५६४ (अंदाजे ३६५ ¼) दिवस लागतात. म्हणून ज्युलियसने  यावर एक युक्तिवाद करून १२ महिन्यांची वाटणी करून काही महिन्यांना ३० तर काहींना ३१ दिवस अशी विभागणी केली. यात फेब्रुवारीला मात्र २८ दिवस नेमून दिले. आता ३६५ दिवस समतोल झाले असून सुद्धा ०.२५ दिवसांचा जो फरक दरवर्षी येणार होता त्यासाठी दर चार वर्षांनी येण्यार्या फेब्रुवारी महिन्यात १ अधिक करून ३६६ दिवसांचे वर्ष ठरवण्यात आले. (३६५+३६५+३६५+३६६ = ३६५.२५). इसवीसनपूर्व १ जानेवारी ४५ या वर्षी हे कॅलेंडर वापरात आणले गेले.तर हा झाला ज्युलियन कॅलेंडरचा इतिहास.

आता वळूयात 'ग्रेग्रोरीयन कॅलेंडरकडे' जे आपण सध्या वापरत आहोत.  १६व्या शतकात हे सौरकॅलेंडर वापरात का आणले गेले याचे मुख्य कारण म्हणजे सौरकालगणना आणि ज्युलियन मधला छोटासा फरक.
मूळ संपतीय वर्षात एक वर्ष हे ३६५.२४२२ दिवसांचे असते तर ज्युलियन कॅलेंडर नुसार वर्ष ३६५.२५ दिवसांचे. यामध्ये ०.००७८ दिवसांचा प्रत्येक वर्षी फरक येऊ लागल्याने, दर १२८ वर्षानंतर ज्युलियन कॅलेंडर मोजताना १ दिवसाची भर पडू लागली. इसवी पूर्व ४५ पासून हा फरक मोजायचा राहून गेला होता. १६व्या शतकात पोप ग्रेगरी १३ यांनी ज्युलियन कॅलेंडर मध्ये सुधारणा सुचवून  इस १५८२ साली ग्रेग्रोरीयन कॅलेंडर अस्तित्वात आणले. ज्यात १५८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात १० दिवस कमी केले. (४ ऑक्टोबर नंतर १५ ऑक्टोबर चा दिवस मोजला गेला) आणि लीप वर्षासंबंधी काही त्रुटी दूर केल्या. १७५२ साली हि कालगणना ब्रिटन आणि ब्रिटीशांचे साम्राज्य असलेल्या देशात स्वीकारली गेली.


शिवाजी महाराजांना विश्वव्यापक बनवायचे असेल तर शिवजयंती तारखेने करायला हवी हा अट्टहास काही शिवप्रेमींचा आहे ( शिवजयंती तारखेने करावी या मताचा मी देखील आहे ) परंतु १९ फेब्रुवारी हा शिवजयंती साजरी करायचा दिनांक ज्युलियन कालगणनेप्रमाणे आहे हे कोणी सहसा लक्षात घेताना दिसत नाही. यासाठी वरील माहितीप्रमाणे कालमापणाचे सोप्पे गणित असे कि, इस १७५२ च्या आधी ज्या नोंदी (ज्युलियन प्रमाणे ) आहेत त्यांचा ग्रेग्रोरीयन दिनांक काढण्यासाठी नोंदीच्या तारखेत १० दिवस सरसकट वाढवावेत. यानुसार १९ फेब्रुवारी मध्ये  १० दिवस वाढवले कि ग्रेग्रोरीयन दिनांक येतो १ मार्च. (लीप वर्ष आले असेल तर हा दिनांक २९ फेब्रुवारी धरावा). 


शिवजयंती साजरी कधी करावी ? तारखेने कि तिथीने ? हा ज्याचा त्याचा प्रश्न. शिवजयंतीचा वाद वाढवण्यासाठी हा लेख लिहला नसून , कालमापणाचा असाही उपयोग दैनंदिन इतिहास अभ्यासात करता येतो यासाठी हि बाजू मांडणे आवश्यक वाटले. बाकी आपण सुज्ञ आहात.

|| लेखनसीमा ||
- रोहित पवार


संदर्भ -
मला उत्तर हवय - मोहन आपटे
संशोधकाचा मित्र - ग.ह.खरे


इतिहासाची कालगणना



'ही गोष्ट सुरु होते १६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा, पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुतीतला प्रचंड ऐवज हरवला ! कुठे गडप झाला हा खजिना?' असं कथानक घेऊन एक उत्कृष्ट कादंबरी रचली गेली जी सद्ध्या चर्चेत आहे. पण इतिहास याबद्दल काय सांगतो याचा 'शोध' अस्सल साधनातून आपण घेऊया.


लुट (काल्पनिक चित्र)


सतराव्या शतकात सुरतेची बाजारपेठ अतिशय समृद्ध आणि कोट्याधीश व्यापाऱ्यांची पंढरीच. हीच सुरत यापूर्वीही शिवाजी महाराजांनी इस १६६६ साली लुटून बरीच संपत्ती स्वराज्यात दाखल केली होती. यानंतर १६७० साली शिवाजीराजांनी पुन्हा सुरतेवर हल्ला चढवला. प्रथम महाराज कल्याणला आले तेथून पंधरा हजाराच्या फौजेनिशी सुरतेत थडकले. २ ऑक्टबर ते ५ ऑक्टोबर असे तीन दिवस सुरतेची धूळधाण केली. या लुटीत शिवाजी महाराजांना एकूण ६६ लाख रुपये मिळाले.
या लुटीदरम्यान शिवाजी महाराजांनी एकीकडे सुरतेतल्या डच, फ्रेंच आणि इंग्रज वखारिंना अभय दिले तर दुसरीकडे मुघल अधिकाऱ्यास पत्र लिहले कि, "दरसाल १२ लाख रुपये न द्याल तर पुन्हा पुढील वर्षी उरलेले शहर जाळून टाकेन". सुरत लुटीने मुघलांना चांगलाच धक्का बसला. लुटीच्या तिसऱ्या दिवशी (५ ऑक्टो) महाराज अचानक सुरत सोडून गेल्याची बातमी पसरली.
सुरतेहून महाराज पेठ - बागलाणमार्गे मुल्हेरकडे (नाशिक जिल्हा) निघाले. साल्हेर-मुल्हेरवरून चांदवडास येऊन कंचनमंचन घाटाने कोकणात उतरणार असे मराठ्यांच्या हालचालीवरून दिसते . पंधरा हजाराच्या फौजेनिशी महाराज चांदवडनजीक आले. मुघल सेनापती 'दाऊदखान कुरेशी' याने मराठ्यांच्या सैन्याला गाठले आणि १७ ऑक्टोबर १६७० रोजी घनघोर युद्ध होऊन त्यात मुघलांचा पराभव झाला.तीन हजार मुघल मारले गेले. हि लढाई 'वणी-दिंडोरीची लढाई' म्हणून प्रसिद्ध आहे. महाराजांना सुरतहून आणलेल्या लक्ष्मीसह अडविण्याचा मोगली प्रयत्न पार धुळीस मिळाला. उघड्या मैदानावर देखील विजय प्राप्त करू शकतो हा मराठ्यांचा विजयिष्णू भाव जागृत होऊन त्या भागातील अलंग,कुलंग,त्रिंगलवाडी हे गडहि स्वराज्यात दाखल झाले. विजयी शिवाजीराजे नाशिकमार्गे सहीसलामत हरिश्चंद्रगडा जवळील 'कुंजरगडावर' येऊन पोहोचले आणि यानंतर ऑक्टोबर अखेरीस रायगडावर पोहोचले.
हि सर्व हकीगत पाहता सुरत लुटीचा खजिना सुखरूप स्वराज्यात पोहोचला असे म्हणावयास हरकत नाही. मुघलांचा हेतू होता शिवाजीराजांना अडवणे आणि महाराजांचा हेतू होता सुरतेहून आणलेला खजिना सुरक्षित घेऊन जाणे, आणि यात शिवाजी महाराज यशस्वी झाले. लुटीचा खजिना हा खुश्कीच्या (जमिनीवरून) मार्गाने आणला गेला . ऑक्टोबर दरम्यान समुद्रामार्गे मराठी आरमार पाठवल्याची अथवा अडवल्याची एकही नोंद नाही.याउलट डच, पोर्तुगीज आणि इंग्रजांचे आरमार मराठ्यांना दबकून होते असे त्यांच्या पत्रव्यवहारातून दिसते. सुरत ते रायगड प्रवासात कुंजरगड, अलंग,कुलंग,त्रिंगलवाड हे गड स्वराज्यात दाखल झाल्याने लुटीतला काही ऐवज या गडांच्या शिबंदीसाठी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा खजिना कुठेही गायब न होता स्वराज्यात दाखल झाला हे वरील पुराव्यांवरून दिसून येते.
- रोहित पवार
संदर्भ :
जेधे शकावली
English Records on Shivaji
शिवकालीन पत्रसार संग्रह
समग्र सेतूमाधवराव पगडी (खंड२)
शककर्ते शिवराय - विजय देशमुख
मराठी रियासत - सरदेसाई

सुरतेची लुट आणि खजिना



इंग्रज हिंदुस्थानात व्यापारासाठी आले. पुढे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली पण कंपनीची अरेरावी खटकु लागल्याने इंग्लड मधील व्यापार्यांनी 'न्यू इंग्लिश कंपनी' सुरु केली. याचबरोबर जुन्या ईस्ट इंडिया कंपनी बंद करण्यात यावी यासाठी ३ वर्षाची मुदत देखील देण्यात आली. आता  या नव्या कंपनिला हिंदुस्थानात मोगल बादशाह कडून पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व  सवलती मिळाव्यात म्हणुन इंग्लडच्या राजाने वकील म्हणुन 'सर विलियम नॉरिसला' बादशाह औरंगजेबाकडे हिंदुस्थानात पाठवले. पुढे दोन्ही कंपन्या एकत्र झाल्याने नॉरिसची वकीली वाया गेली, पण भेटी दरम्यान त्याने दैनंदिनी टिपुन ठेवली.
२५ जानेवारी १७०१ रोजी नॉरिस सुरतेहुन औरंगबादकडे निघाला. २२ फेब १७०१ रोजी शहागड (औरंगबाद) गावी आला. याठिकानी सुरतेच्या एका सुप्रसिद्ध व्यापार्याची वखार होती तिथे मराठयांनी धमाकुळ घातला होता. "मोठेमोठे मोगल अधिकारी प्रवास करण्यास घाबरत, इतका त्यांना मराठयांचा धाक वाटत" ,असे त्याने नमुद केले आहे.
मराठयांचे सातारा,पन्हाळगड इत्यादि किल्ले जिंकन्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हपुरीहुन मिरज मार्गे पन्हाळगडाकडे प्रस्थान केले होते. औरंगजेबच्या प्रवासाची ही माहिति जमा करुन त्याच्या मागाहुन नॉरिस २७ मार्च १७०१ रोजी मिरजेस पोहोचला. बादशाह औरंगज़ेब नुकताच इथे राहुन गेला होता. त्याच्या छावणीची जागा नॉरिसने पाहिली. छावणीभोवतीचा संरक्षण 'खंदक' पाहुन नॉरिसला हसु आले. तो म्हणतो, 'हा कसला खंदक ! सहा-सात वर्षाचे मुलसुद्धा हा खंदक सहज ओलंडु शकेल.
संदर्भ : Norris Embassy to Aurangjeb - Haridaas

मराठ्यांची धास्ती आणि औरंगजेबचा खंदक !


शिवचरित्र जाणून घ्यायचे असेल तर शिवपुर्वकालीन देशस्थिती ज्ञात असणे आवश्यक वाटते.शिवाजीराजांनी इतर साम्राज्यापेक्षा स्वराज्यात जनतेला वेगळं असं काय दिलं? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी शिवपूर्वकाळाचा आढावा घ्यावा लागतो. शिवपूर्वकालीन हिंदुस्थानावर नजर टाकली तर बहुतांश भागांवर इस्लामचे आधिपत्य झाले होते हे लक्षात येईल. इथले सत्ताधीश स्वतःला इस्लामचे अनुयायी म्हणवत. अशा या सत्ताधीशांविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोषाची भावना होती.या यावनी सत्तेचे स्वरूप हे प्रामुख्याने 'लष्करी' होते.

इथे आलेले इस्लामी लोक हे मूळचे अरबी , इस्लामचा संस्थापक मुहम्मद पैंगंबर इ.स.६६२ मध्ये मरण पावला.  तोपर्यंत इस्लाम धर्मप्रसाराला वेगळा रंग चढला होता. मग धर्मवेडाने पेटलेल्या या अरबांनी पैंगंबरच्या मृत्युनंतर जगभर आक्रमणे करून सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. या आक्रमणाची एक लाट आठव्या शतकाच्या मध्यात इराण ओलांडून भारत व चीन पर्यंत पोहोचली. 

इस्लामी दाहकतेच पहिला संबंध आला तो इ.स. ७११ मध्ये मुहम्मद बिन कासीमच्या वेळी, यावेळी सिंध प्रांताचा चा हिंदु राजा 'दाहीर' याचा पराभव झाला.या स्वारीची जी वर्णने उपलब्ध आहेत त्यावरून हजारोंच्या कत्तली करणे,गुलाम म्हणून जनतेला कैद करणे,स्त्रियांचा छळ अशा प्रकारे विध्वंस माजवला.सुदैवाने हा मुहम्मद कासीम सिंध प्रांत ओलांडून दक्षिणेकडे आला नसल्याने त्याची दाहकता भारतातील इतर भागांना पोहोचली नाही. सुदैवाने या स्वारीनंतर हिंदुस्थान सुमारे ३०० वर्ष इस्लामी आक्रमणांपासून मुक्त राहीला. पण त्यानंतर इस्लामी आक्रमणे येतच गेली त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ.

महमुद गझनवी (इ.स. ९९८-१००२) - याने भारतावर एकूण १७ स्वाऱ्या केल्या त्यात प्रचंड मानवी संहार आणि लुट , मंदिरे उध्वस्त केली,स्त्रीयांचा अमानुष छळ केला.गुजरात मधील भव्य आणि प्रसिद्ध सोमनाथ मंदिर पाडले.

मुहम्मद घोरी (इ.स.११७५-१२०६)  - नुसती लुट न करता इथेच  सत्ता स्थापन करावी या उद्देशाने घोरी भारतावर आला, याने इस्लामचा पाया घालुन दिल्लीस सूलतानशाहीची स्थापना केली, यानंतर तब्बल एक लाख लोकांची हत्या करून दबदबा निर्माण केला.

अल्लाउद्दीन खल्जी- (इ.स.१3१३-१३१६) : खल्जी घराणे भारतात आले त्यावेळी महाराष्ट्रात देवगिरीचे यादव राज्य करत होते. खल्जी वंशातल्या या अल्लाउद्दिनने विचित्र कायदे केले -हिंदुनी घोड्यावर बसू नये, हत्यार बाळगु नये, मौल्यावान पोषाख घालु नये असे कायदे केले, मूर्तीपुजेस बंदी , जिझिया कर लादून अमानुष छळ केला.

मुहम्मद तुघलक - (इ.स.१३२५-१३५१) हा तुघलक विक्षिप्त म्हणून प्रसिद्धच होता, याने जनतेवर  एवढे कर बसवले कि गरीब जनता पार धुळीस मिळाली, श्रीमंत बंड करून उठले. दुष्काळी परिस्थितीत गावच्या गाव ओसाड झाली.

तैमुर -(इ.स.१३७२-१४०५) दिल्लीच्या लढाईत तुघ्लूकाचा पराभाव झाला आणि दिल्ली शहर तैमुरच्या हाती सापडले, उपलब्ध वर्णनानुसार सतत पाच दिवस त्याने दिल्ली रक्ताने धुवून काढली.

बाबर -(इ.स. १५२६ -१५३०) मुघल राजवाटीची मूळ सुरवात बाबरच्या भारत स्वारी पासून झाली.यानेही जनतेचे अतोनात हाल करत काफिरांच्या(हिंदूंच्या) शिरांचे पहाडीवर मनोरे रचून विजयोत्सव केला, स्त्रियांचा छळ, तसेच मंदिरे पडून तिथे मशिदी बांधल्या.

अकबर -बाबरची राजसत्ता पुढे कायम करत अकबरने असंख्य हिंदूंचे सक्तीचे धर्मांतर केले , पुढे चितोड हत्याकांडात जे राजपूत ठार केले , या मृत शरीरांवरून जमा केलेल्या जाणवांचे वजन तब्बल ७४ मण भरले एवढा संहार केला.अशीच भयंकर आणि दाहक कारकीर्द पुढे जहांगीर ,शाहजहान यांनी  चालू ठेवली.

शिवपूर्वकाळात सर्व शाह्यातील सुमारे ७२ सुलतानांनी सतत तीन शतके महाराष्ट्र आपल्या जुलूमांनी भरडून काढला.

Shivpurvkalin Maharashtra
देवगिरी किल्ला

शिवपूर्वकाळात भारतात तथा महाराष्ट्रात अनेक हिंदु राजे होऊन गेले, पुढे यावनी आक्रमणात अनेकांनी कडवा प्रतिकार देखील केला.महाराष्ट्रात सातवाहन- वाकाटक - राष्ट्रकुट - चालुक्य - शिलाहार -कदंब या राजवंशानी राज्य केले. त्याबद्दल थोडक्यात माहिती आता पाहु -

सातवाहन - (इ.स.पुर्व २३२ ते ~ इ.स. २१०) सातवाहनांचे वैशिष्टय असे की त्यांची सागरावर सत्ता होती. पैठण ही त्यांची पहिली राजधानी.याकाळात प्रजा आनंदी, स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्य व प्रतिष्ठा होती. याच काळात शालीवाहन शक या कालगणनेचा उदय झाला.

वाकाटक - (इ.स. २४८ ते  ~इ.स. ४९३) यांनी विदर्भात सत्ता स्थापन केली.त्यांच्या काळात धर्म , विद्या , कला , स्थापत्य, शिल्प यांना महत्व होते असे दिसते.

चालुक्य - (इ.स.५०० ते ७५०) हे घराणे मूळचे अयोध्येकडील.वाकाटकानंतर चालुक्य राजवंशाने सुमारे २५०वर्षे राज्य केले.शिल्पकलेत चालुक्य शैलीची मंदिरे , शिल्पे उत्कृष्ट समजली जातात.

राष्ट्रकुट - (इ.स.७५० ते ९८३) चालुक्यानंतर राष्ट्रकुटांनी २०० वर्षे राज्य केले. याच काळात जगप्रसिद्ध कैलास लेणे खोदले गेले. हे  यांच्या कारकिर्दीतच मुसलमान व्यापारी पश्चिम किनाऱ्यावर उतरले. राष्ट्रकुटांच्या काळातच संस्कृतीला विकृत स्वरूप येऊ लागले.सोवळे-ओवळे, देवदासी, विधवा केशवपन व सतीची चाल हळू हळू रूढ झाली.

  सातवाहनकाळातील महाराष्ट्राचा वैभवसूर्य राष्ट्रकुटांच्या काळात ढळू लागलेला दिसतो.
शिलाहार - (इ.स. ८२५ ते १२६५) या राष्ट्रकुटांनंतर महाराष्ट्रावर चालुक्य, कदंब आणि शिलाहारांचे राज्य आले.  कादंबांचे आरमार हा एक अभ्यासाचा विषय आहे. एकाचवेळी या सत्ता निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करीत होत्या. कोकणात शिलाहार राज्य करीत , शिलाहारांचे वैशिष्टय म्हणजे बळकट डोंगरी किल्ले बांधण्याचा पहिला घाट त्यांनी घातला

यादव -  (इ.स. ११७८ ते १३१८) देवगिरीकर यादवांनी शिलाहार व कदंब यांना जिंकून सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली.यादव हे यदुवंशीय आणि राजभाषा मराठी, सुवर्ण गरुडध्वज हे यादवांचे निशाण होते.१२२८ मध्ये पुंडलीकाने पंढरपुरी श्री विठ्ठलाची स्थापना केली. पुढे रामचंद्रदेव राजाच्या कारकिर्दीत संत ज्ञानेश्वरांनी हा काळ अविस्मरणीय केला. पण हा सुखद काळ जास्त दिवस टिकला नाही.

       रामदेवराय राजाच्या कारकिर्दीत दिल्ली सुलतानाचा पुतण्या (आणि जावई) 'अल्लाउद्दिन खल्जी' देवगिरीवर चालून आला. दुर्दैव हे की यावेळी रामदेवपुत्र 'शंकरदेवराय' दक्षिणेत सैन्य मोहिमेवर घेऊन गेला होता.अशा परिस्थितीत हे यावनी आक्रमण यादवांना सोसले नाही आणि यादवांचा गरुडध्वज पडला.तब्बल २०० वर्षांची उज्वल परंपरा लाभलेलं देवगिरीच वैभवशाली साम्राज्य अवघ्या १५-२० दिवसात कोसळले. यादव साम्राज्याचा अस्त झाल्यावर पुढे ३०० वर्ष इस्लामी राजवटीचा वरवंटा फिरतच राहिला.

यापुढील प्रदीर्घ काळात.बहमनी, तुघलक, खल्जी, निजामशाही, आदिलशाही, बरिदशाही , इमादशाही, मोगल, पोर्तुगीज यांनी थैमान घातले.शिवपूर्वकालीन हिन्दुस्थानाचे इस्लामी राजवटीचे स्वरूप नुसते वरवर न्याहाळले तरी शिवपुर्वकालीन भारत कोणत्या बिकट आणि विचित्र परिस्थिती मधून जात होता आणि शिवाजीराजे जन्माला नसते आले तर काय परिस्थिती उद्भवली असती हे आता कोणालाही उमजू शकेल.

|| लेखनसीमा ||
  रोहित पवार

संदर्भ :
शककर्ते शिवराय (खंड १) - विजयराव देशमुख
श्री राजा शिवछत्रपती - गजानन मेहेंदळे
मुसलमानपुर्व महाराष्ट्र - वा.कृ. भावे
शिवकालीन महाराष्ट्र - वा.कृ. भावे

शिवपुर्वकाळ


सातारा जिल्ह्यात प्रतापगड सोडल्यावर महाबळेश्वरकडे जाताना साधारण ३-४ किमी डावीकडे जावळीच्या मोरे घराण्याचे कुळ आहे. हे जावळीचं बेलाग खोरं  इतकं अवघड आणि अभेद्य की, १४व्या शतकात ५००० मुसलमानी फौजा जावळीत गेल्या , त्या परतल्याच नाहीत आणि त्याचं काय झालं याचा ठाव ठिकाण देखील लागला नाही.अशी हि जावळी प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी अशी कोणाची हिम्मत नव्हती.चंद्रराव हे विजापुरकरांचे (आदिलशहा) पिढीजात जहागीरदार होत.

Jawali More and Shivaji Maharaj
जावळीचे खोरे
 मोरे घराणे :
जावळीच्या संस्थानची स्थापना करण्याऱ्या मूळ व्यक्तीचे नाव 'चंद्रराव' असे होते. या चंद्ररावला ६ मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वत:जवळ ठेवले आणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमून दिल्या. थोरल्या शाखेत चंद्रारावापासून पुढील ८ पिढ्या झाल्या. चंद्रराव - चयाजी - भिकाजी - शोदाजी - येसाजी - गोंदाजी - बाळाजी - दौलतराव. जावळीचा  हा प्रत्येक शाखापुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला.

या शाखेतला आठवा पुरुष दौलतराव निपुत्रिक होता, म्हणून त्याची आई माणकाई हिने कृष्णाजी बाजी यास दत्तक घेतले आणि जावळीच्या गादीवर बसवले. वास्तविक दत्तक घेतलेल्या चंद्ररावाचे नाव 'येसाजी' होते हे २२ डिसेंबर १६५७ सालच्या एका महजरावरून दिसून येते.  महजरातील या उल्लेखाचा शिवभारत व मोऱ्यांची बखर याच्याशी मेळ घातला की , कृष्णाजी व बाजी हे त्याचे मुलगे होते असे अनुमान निघते. या दत्तक प्रकरणा दरम्यान काही कारणास्तव आदिलशाहीकडून मदत न घेता माणकाईने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले.

या चंद्ररावाला जे भाऊबंद होते त्यापैकी प्रतापराव,यशवंतराव (कसबे शिवथर), हणमंतराव (जोर), दौलतराव (महिपतगड), गोविंदराव (जांभळी), कोंढवी परगण्यातील केवनाळे व वाकण येथील बागराव ऊर्फ भिकाजीराव, आटेगाव तरफेतील देवळी येथील सूर्यराव .

वाई परगण्यातील बावधन या गावच्या गोमाजी नरसिंह व रामजी कृष्ण या दोन अधिकाऱ्यांनी चंद्ररावाला पाठविलेले पत्र उपलब्ध आहे. या पत्राच्या सारांशानुसार 'चंद्रराव' येसाजीचे गादीवर येणे ही घटना १८ जून १६४६ नंतर घडली आहे असा निष्कर्ष निघतो. चंद्ररावाला गादीवर बसवण्यात शिवाजी महाराजांची मदत झाली.पुढे ..१६४८ मध्ये स्वराज्यावर चालून आलेल्या फतहखानच्या स्वारीपूर्वी महाराजांनी आपल्या मावळ्यांना उद्देशून एक भाष्य केल्याचे शिवभारतात सांगितले आहे (अध्याय १३). त्यात  त्यांनी म्हटले आहे की,

"लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली जावळी मी पूर्वी घेतली आणि तिचा अभिलाष करणाऱ्या चंद्रारावाची तिथे स्थापना केली." 

याचाच अर्थ ,येसाजीला(चंद्रराव) दत्तक घेताना आदिलशाहकडून संमती घेतली गेली नव्हती. त्यामुळे आदिलशाह नाराज होणे स्वाभाविकच होते. त्यातच भर म्हणून इ.स.१६४९ च्या काही दिवस आधी चंद्ररावचा चुलत भाऊ हणमंतरावने जोर खोरे घेतले. हा भाग अफजलखानकडे (आदिलशाही सुभेदार) असलेल्या वाई परगण्यातला होता. त्या प्रसंगी अफझलखान याने कान्होजी जेध्यांना पत्र पाठवले होत.

चंद्रराऊ कदीम मयत जालियावरी (जावळी) गैरी लोकी पैस करून बळकाविले  आहे. याबद्दल त्यावरी नामजादी केली आहे" - अफजलखान

 याचा अर्थ असा की, कदीम (पूर्वीचा) चंद्रराव मरण पावल्यावर जावळी गैरी लोकी  पैस करून (घुसखोरी करून) बळकाविले आहे व म्हणून त्यांच्याविरुद्ध नामजादी केली आहे. (नेमलेले आहे) वरील उताऱ्यावरून, 'गैरी लोक' या शब्दांनी चंद्रराव येसाजी व त्याचे साथीदार अभिप्रेत असावेत. येसाजीची जावळीच्या गादीवरील स्थापना आदिलशहाच्या परवानगीशिवाय झालेली होती हेच अफझलखानाच्या जावळीवरील स्वारीचे कारण होते. परंतु काही कारणास्तव ही स्वारी सुरु होण्याआधीच संपली.

पुढे शिवाजीराजे आणि चंद्रराव यांत वाद होत गेले आणि शिवाजी महाराजांना जावळीवर स्वारी करणे भाग पडले याबद्दल उत्तरार्ध मध्ये सविस्तर लिहले आहे.

|| लेखनसीमा ||
  रोहित पवार


संदर्भ :
मोरे बखर (ऐतिहासिक बखरी खंड २) | संपादक : अविनाश सोवनी
श्री राजा शिवछत्रपती -   गजानन भास्कर मेहेंदळे
शिवाजी आणि चंद्रराव मोरे - वैद्य चिंतामण विनायक 
परमानंदकृत शिवभारत - संपादक : स.म.दिवेकर

जावळीचे मोरे प्रकरण-पूर्वार्ध

एकीकडे शिवाजी महाराजांचे स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत होते, अश्या परिस्थितीत जावळीकर चंद्ररावाला एकतर शिवाजीराजांचे प्रभुत्व मान्य करावे लागणार अथवा पुढे कधीनाकधी या दोघांमध्ये वितुष्ट येणार हे उघड होते. या मोऱ्यांनी महाडपासून महाबळेश्वरपर्यंतचा डोंगरी भाग व बहुतेक सातारा विभाग काबीज केला होता. कोकण व घाटमाथा यावरील सर्व रस्तेही मोऱ्यांच्या ताब्यात होते.या कारणांमुळेच महाराजांचे जावळीकडे प्रारंभापासून लक्ष होते.


Jawaliche More


इस १६४७ मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या चंद्ररावास शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर बसण्यात मदत केली होती हे आपण मागील प्रकरणात पहिले.ते यासाठीच की या उपकारामुळे जावळीकर मोरे हे आपले मित्र होतील व हिंदवी स्वराज्य-संवर्धनात त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल.परंतु लवकरच चंद्ररावाने महाराजांशी उघड शत्रुत्व आरंभले. स्वराज्य संवर्धनामुळे नकळत मोऱ्यांच्या स्वतंत्र सत्तेला धोका उत्पन्न झाला.महाराजांचे उपकार विसरून या चंद्ररावाने आदिलशाही निष्ठा जाहीर करून महाराजांना शह देण्यास आरंभ केला तो असा,

१) बिरवाडी टप्पाखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले.ती गावे स्वतः बळकावली. इ.स. १६५१-५२ मध्ये हे पाटील महाराजांकडे मदत मागण्यासाठी आले, महाराजांनी त्यांची वतनावर पूर्णस्थापना केली.चंद्रराव स्वाभावीकच चिडला असल्यास नवल नाही.

२) पुढे लवकरच स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुळकर्णी 'रंगो त्रिमल वाकडे' याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास आला.चंद्ररावणे त्यास आश्रय दिला आणि महाराजांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली.

३) चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते त्यामुळे चंद्ररावाने त्यास जीवे मारले. या रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने रोहीडेखोऱ्यात आला.चंद्ररावाने सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही. स्वराज्य कक्षेत असणार्या रोहीडेखोऱ्यात घुसून त्याने लुमाजीला ठार केले.

४) अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करणाऱ्या चंद्ररावाने आता भेदनीतीचा अवलंब केला, गुंजणमावळात देशमुखी कोणाकडे यावरून शिंदे-चोरघे-शिलिमकरयांच्यात जुना वाद होता. शिलिमकरांनी यापूर्वी फतहखान मोहिमेत महाराजांना साथ दिली होती, त्यामुळे साहजिकच महाराजांनी त्यांचा पक्ष देशमुखीसाठी उचलून धरला. परंतु चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा असल्याने मन वळवण्याच्या प्रयत्न चंद्ररवाने केला.हे वृत्त समजताच महाराजांनी शिलिमकरांना ताबडतोब अभयपत्र पाठवून मनधरणी केली.

एकीकडे शिलिमकरांना अभयपत्र पाठवले तर दुसरीकडे शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला जरबेचे पत्र पाठवले , त्यावर प्रतिक्रिया म्हणून 'येता जावली जाता गोवली' अशा शब्दात धमकीवजा उत्तर चंद्ररावाकडून मिळाले (मो.ब.), परंतु मोरे बखरीत आलेला पत्रसंवाद कालोकाल्पित वाटतो. समोपचाराने जावळी प्रकरण प्रकरण मिटत नाही हे आता स्पष्ट झाले होते. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते.पण जावळीवर आक्रमण करणे तितके सोप्पे नव्हते. कारण विजापूरकर चंद्ररावाची पाठराखण करीत होता. वाईचा सुभा अफजलखानाकडे होता.शाहजीराजे सुद्धा नुकतेच अटकेतून मुक्त झाले होते. त्यामुळे अनुकूल संधीची वाट पाहणे भाग होते.

लवकरच अशी अनुकुलता महाराजांना लाभली. विजापूरकर आदिलशाह मरणासन्न झाला होता, त्यामुळे गादीसाठी विजापुरास अंतर्गत कलह सुरु झाले होते.अफझलखानही कर्नाटकात रवाना झाला होता, अशावेळी जावळीवर हल्ला केल्यास चंद्ररावाच्या मदतीला लगेच कोणीतरी धावून येईल ही शक्यता कमी होती. म्हणून जावळीवरील मोहिमेला सुरवात झाली, ती जोर खोऱ्यावरील हल्ल्याने. जेधे शकावली नुसार-

"त्यावरी जाउलीवरी मोहीम केली. कान्होजी नाईक यांस व अवघ्या देशमुखांस जामावानसी बोलाविले. जांबलीस मोरे होते. ते जेध्यांनी आधीच पिटाळून लाविले होते. जांबलीस मोरे कोणी नव्हते. जोरामध्ये हनमंतभाऊ मोरे होते. त्यावरी राजश्री स्वामींनी (शिवाजी) रघुनाथ बल्लाळ सबनीस पुण्याहून स्वरांच्याजमावानसी पाठवले. त्यांनी हनमंतभाऊ यास मारून जोर घेतले, जाउली मात्र राहिली होती."



यानंतर शिवाजीराजे पुरंदरवरून जावळीवर आक्रमणार्थ दहा हजारांची फौज घेऊन निघाले (शि.का.). महाराजांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या. मोठी तुकडी रडतोंडी घाटाच्या दिशेने गेली तिकडे मोऱ्यांच्या सैन्याने प्रतिकार केला. छोट्या तुकडीसोबत खासे महाराज महाबळेश्वर मार्गे निसणीच्या घाटाने जावळीत उतरले. त्यांना विशेष प्रतिकार झालाच नाही. दुपारपर्यंत मोठी फौजही तिथे पोहचली आणि शिवाजीराजांनी जावळी हस्तगत केली.  शके १५७७ मन्मथ संवछरी राजश्री सिवाजीराजे यांनी पौष चतुर्दशीस जाऊन जावली घेतली [१५ जानेवारी १६५६] (जे.श.)

चंद्रराव (येसाजी) पळून रायरीच्या (आत्ताचा रायगड) किल्यावर आश्रयास गेला. शिवाजीराजांच्या सैन्याने त्याचा पाठलाग केला. पुढे चंद्ररावाला आणि त्याच्या कृष्णाजी व बाजी या मुलांना शिवाजीराजांनी कैद केले.शरण आलेल्या चंद्ररावाने काही दिवसात पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवाजीराजांनी त्याला आणि कृष्णाजीला ठार केले. बाजी मात्र पळून गेला.

जावळी घेतल्यावर लवकरच चंद्रगड,मकरंदगड,चांभारगड हे किल्ले स्वराज्यात सामिल झाले. शिवाजी महाराजांचे लक्ष जावळीतल्या भोरप्याच्या डोंगरावर गेले.त्याचा 'ढोळपाळाचा डोंगर' असाही उल्लेख मिळतो (प्रतापदुर्गामहात्म्य). जावळी अभेद्य करण्यासाठी महाराजांनी भोरप्याच्या डोंगरावर किल्ला बांधायचा निश्चय केला आणि लगेच मोरोपंत पिंगळे यांना गड बांधण्यास सांगितले . गडाचे नामकरण 'प्रतापगड' असे करण्यात आले.ही जावळी ताब्यात आल्याने कोकणात उतरण्याचा मार्ग खुला झाला. आणि नव्याने बांधलेल्या याच प्रतापगडाने पुढे महाराजांचा अफझलखानासोबत घडलेला महापराक्रम पाहिला.

|| लेखनसीमा ||
  रोहित पवार


संदर्भ :
मोरे बखर (ऐतिहासिक बखरी)- संपादक : अविनाश सोवनी
परमानंदकृत शिवभारत - संपादक : स.म.दिवेकर
प्रतापगडदुर्गमहात्म्य - संपादक : सदाशिव शिवदे
श्री राजा शिवछत्रपती -   गजानन भास्कर मेहेंदळे
शककर्ते शिवराय - विजय देशमुख

जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध