Ghorpad लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Ghorpad लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

          इतिहास हा दंतकथांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. या दंतकथांभोवती आकर्षणाचं एक वलय असल्याने त्या कितीही जुन्या असल्या तरी शिळ्या वाटत नाहीत. शिवकाळातही एक प्रसिद्ध दंतकथा सांगितली जाते ती म्हणजे १६७० साली 'तानाजी मालुसरे' यांनी घोरपडीच्या सहाय्याने चढून कोंढाणा किल्ला (सिंहगड) घेतला (ऐ.पो.पृ- ८३). शाहीर तुलसीदासाच्या पोवाड्यात आलेला हा उल्लेख आहे. परंतु सभासद बखरीत "...जैसा वानर चालून जातात त्याप्रमाणे मावळे गड चढून गेले"(स.ब.पृ-६७) असे लिहले आहे आणि तेच सत्य असावे. पण जरी वरील घोरपडीची घटना सत्य नसली तरी यापूर्वी घोरपडीच्या सहाय्याने गड जिंकण्याचा प्रकार पंधराव्या शतकात (इ.स.१४७०) घडलाय आणि त्याचे पुरावेदेखील मिळतात.

यावेळी भारतात बहामानींची सत्ता होती. महमदशा बहामनी (दुसरा) हा सत्तेवर आला, त्याचा वजीर 'महमूद गावान' हा मोठा पराक्रमी होता. या गावानने दक्षिण कोकण जिंकण्याची मोहीम हाती घेतली. तो कोकणात उतरला.पूर्वीच्या एका घटनेचा सूड घेण्यासाठी त्याने 'खेळणा' उर्फ 'विशालगड'वर स्वारी करायचं ठरवलं. हा किल्ला त्यावेळी कोकणातील राजा 'शंकरदेव मोरे' याच्या ताब्यात होता.या शंकररायाचा अंमल समुद्रापर्यंत असून त्याजजवळ तीनशे जहाजांचे आरमारही होते.त्यांचा मदतीने तो मुसलमान व्यापारांस फार उपद्रव देई.(मु.रि. खं१ पृ-२१६).त्याला शह देण्यासाठी महमद गवान पहाडी पायदळ घेऊन 'खेळण्यावर' आला.

मुधोळ संस्थान

कोल्हापूरमध्ये मलकापूरनजीक हा दुर्ग वसला आहे. सह्याद्रीच्या बिकट रांगेतील हा बेलाग आणि नावाप्रमाणेच विशाल असा हा दुर्ग त्याला सहजासहजी जिंकता येईना, मौलाना अबुसयीरला लिहलेल्या पत्रात गवान लिहतो की, "… खेळण्याच्या किल्ल्याला वेढा घातला ,या किल्ल्याची मजबुती आणि शक्ती पाहून माझी खात्री झालीय की हल्ला करून तो आपल्या ताब्यात येणे शक्य नाही "(दुर्ग, पृ -५४०). अनेक महिने गेले तरी किल्ला हाती येत नव्हता. यावेळी महमूद गावानच्या फौजेतील सरदार कर्णसिंह आणि भीमसिंह या पितापुत्रांनी एक युक्ती सुचवली, ती म्हणजे घोरपडीच्या सहाय्याने किल्ला चढून जाण्याची. घोरपड हा साधारण पालीसारखा दिसणारा पण आकाराने मोठा असा प्राणी. याच्या फताड्या पायांमुळे आणि मोठ्या नखांमध्ये भिंत घट्ट धरण्याची क्षमता असते.

ठरल्याप्रमाणे एका काळ्याकभिन्न रात्री काही घोरपडींच्या कमरेला दोर बांधून हे पितापुत्र मोजक्या सैन्यानिशी किल्ल्यावर चढून गेले आणि आतून बंद असलेला किल्ल्याचा दरवाजा उघडला. बाहेर महमूद गावान दबा धरून बसले होते . दरवाजा उघडताच त्यांनी किल्ल्यात प्रवेश करून तो हस्तगत केला. मात्र लढाईदरम्यान कर्णसिंह धारातीर्थी पडले.(मु.सं.इ परि, पृ१५).पण त्यांच्या पराक्रमाने दक्षिण कोकणचे प्रवेशद्वार असणारा 'खेळणा' किल्ला मात्र ताब्यात  आला.

एक कल्पनाचित्र 

या प्रसंगानंतर बादशाह महमदशहाने कर्णसिंहाचा पुत्र 'भीमसिंहाला' दिलेल्या फर्मानात स्पष्ट उल्लेख आहे की, 'सोसमार' म्हणजे 'घोरपड' घेऊन रात्रीच्या वेळी त्यांच्या कंबरेस दोर बांधून आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या त्या 'खिलना' किल्याच्या कांगोऱ्यावर त्यांना पाठवले आणि किल्ल्याचा दरवाजा उघडला..." यापुढे तो असेही लिहतो की, "...या लढाईत करणसिंघ कामास आला. या कुलाच्या शाश्वतीसाठी आणि चाकरीसाठी ८४ गावांसह मुधोळ पूर्वीप्रमाणे बहाल करण्याचे फर्मावतो.याशिवाय रायबाग व वाई हे परगणे बक्षीस देतो तसेच त्यांना 'राणा' ऐवजी 'राजा घोरपडेबहाद्दर ' हा किताब बहाल करतो आणि घोरपडीच्या रंगाचे निशाण देतो, ते त्यांनी आपल्या स्वारीत ठेवावे" .फार्मानावर तारीख आहे -२२ ऑक्टोबर १४७१. (मु.सं.इ परि, पृ१६). सदर फर्मान बनावट असल्याचे गजानन मेहेंदळे यांचे मत आहे.

याशिवाय करवीर सरदारांच्या कैफियती मधे घोरपडीचा आलेला हा उल्लेख, "..असे दर जागी पराक्रम स्वतः फौजेनिसी केले. त्यामुळे बादशहाची मर्जी खुश होऊन "घोरपडे" म्हणोन किताब दिल्हे कारण हेच कि जेथे जेथे प्रसंग पडेल तेथे घोरतर युद्ध करून जय मिळवतात...निरुपाय असले ठिकाणीसुद्धा 'घोरपडीचे' कंबरेस दोरी बांधून आत्मादेह क्षात्र धर्माकडे चित्त पुरवून हल्ला करतात. सबब त्यास घोरपडे असे किताब आबदागिरी वगैरे चिन्हे द्यावी,असी योजना करून दिल्हे." (क.स.कै, पृ-६९)

कर्णसिंह आणि शुभकृष्णसिंह हे भोसाजीचे पणतू. भोसाजीचे वंशज ते भोसले. वरील घटनेनंतर 'भीमसिंह' हा 'घोरपडे' बनला तर देवगिरीकडील 'शुभकृष्ण' मात्र 'भोसले'च राहिला [हेच छ.शिवाजी महाराजांचे घराणे](मु.सं.इ परि,पृ१७०-१७४).'पुढे बहमनी सत्तेचे पाच तुकडे पडून पाच शाह्या वेगळ्या झाल्या त्यापैकी एक आदिलशाही उदयास आली. तेव्हा या पराक्रमी घोरपडे मंडळींनी आदिलशाहीला साथ दिली.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेनंतर मात्र या घराण्याने स्वराज्याची इमानेइतबारे सेवा केली.'संताजी घोरपडे' हे त्यापैकीच एक !

* घोरपडीच्या मदतीने भिंतीवर चढून जानं कितपत शक्य आहे याची प्रत्यक्षात पडताळणी आम्ही केलेली नाही. पण मिळालेले संदर्भ पाहता हा लेख आपल्यासमोर मांडला आहे. बाकी आपण सुज्ञ आहात.

||लेखनसीमा||
 रोहित पवार


संदर्भ : 
ऐतिहासिक पोवाडे - य.न.केळकर
सभासद बखर - हेरवाडकर
मुसलमानी रियासत - गो.स.सरदेसाई
करवीर सरदारांच्या कैफियती - स.मा.गर्गे
मुधोळ संस्थानच्या घोरपडे घराण्याचा इतिहास- द.वि.आपटे.
मंतरलेला इतिहास - हर्षद सरपोतदार 
दुर्ग - सतीश अक्कलकोट 











घोरपडीची कुळकथा