शिवजन्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिवजन्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिवजन्मतारखेचा वाद सरकारी पातळीवर मिटविण्यात काही संशोधक-अभ्यासकांना पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे इस २००० साली यश आले असले या वादाची नेमकी करणे कोणती ? हे इतिहास अभ्यासक नात्याने समजून घेणे आवश्यक वाटते, तर त्यावेळी शिवजन्माच्या मुद्द्यावरून मुख्यत्वे २ गट पडलेले होते , एक म्हणजे वैशाखवादी जन्मतिथी मानणारा आणि दुसरा फाल्गुनवादी.

वैशाखवादी - वैशाख शुद्ध द्वितीया /पंचमी शके १५४९ (८/१० एप्रिल १६२७) 
फाल्गुनवादी - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०)





 
 > इस १८९६  १८९५ साली राष्ट्रीय लोकसंघटनेच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशउत्सव आणि शिवजयंती  सार्वजनिकरित्या सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक संशोधनाची बहुतेक साधने उजेडात आली नव्हती.अशा अवस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या साधनांवरून वैशाख शुद्ध  द्वितीया शके १५४९ असे एकमताने गृहीत धरून शिवजयंतीला सुरवात झाली.

इस १९१६  यानंतर जे महत्वाचं साधन समोर आलं ते म्हणजे 'जेधे शकावली' , जी लोकमान्य टिळकांना दाजीकाका जेधे देशमुख यांच्याकरून प्राप्त झाली , या जेधे शकावली मध्ये शिवजन्माची तिथी - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ अशी दिलेली होती.हे दोन वेगवेगळे पुरावे ('चिटणीस बखर' विरुद्ध 'जेधे शकावली' ) जेव्हा समोर आले तेव्हा वादाला प्रारंभ झाला.

त्यातच तंजावरच्या बृहद्दीश्वर मंदिरातील एक शिलालेख उजेडात आला त्यात देखिल फाल्गुन वद्य तृतीया शक १५५१ असाच उल्लेख सापडला. इथून शिवजन्मतिथीच्या इतिहास संशोधनाला सुरवात झाली.

> इस १९१८ - अशा अवस्थेमधे सदाशिव दिवेकर यांनी तंजावर येथे कवी परमानंद याने लिहलेला 'शिवभारत' हा ग्रंथ शोधून काढला. मुळ संस्कृत ग्रंथ व्यवस्थितपणे संपादन करून झाल्यावर या ग्रंथात देखील शिवजन्मतिथी ही फाल्गुन वद्य तृतीया शक १५५१  अशी नोंद सापडली. संपादना दरम्यान अस लक्षात आलं की ग्रंथाचा मुळ लेखक परमानंद शिवाजीराजांना समकालीन, निकटवर्तीय होता.पुढे  'दत्तोपंत आपटे' यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलं की याने आपलं काव्य शिवाजीराजांच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहलं.त्यामुळे शिवभारत ग्रंथाला अधिक महत्व प्राप्त झालं 

इस १९२५ - ३ फेब्रुवारी १९२५ च्या 'केसरी' मध्ये का. ना. साने, द. वि. आपटे, द. वा. पोतदार इत्यादी बारा जणांनी नवीन तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचे पत्रक प्रसिद्ध केले.

इस १९२५-३५ - प्रख्यात इतिहासकार गौरीशंकर ओझा, यांनी ब्यावर (राजस्थान) येथील एका प्रख्यात ज्योतिष कुटुंबाच्या खासगी संग्रहातून महाराजांची कुंडली शोधून काढली.पुढे राजस्थानातच बनेडा, बिकानेर या ठिकाणी शिवछत्रपतींच्या आणखी २ कुंडल्या सापडल्या , या सर्व कुंडल्यामध्ये फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ हीच तिथी आढळून आली. फाल्गुनवादी अभ्यासकांनी आपल्याकडील पुरावे कमी पडतात म्हणून या  शिवछत्रपतींच्या कुंडल्या पुढे आणल्या.


इस १९६६ - महाराष्ट्र सरकारने शिवजन्मतिथीचा हा वाद मिटवण्यासाठी ३ नोव्हेंबर १९६६ रोजी इतिहासतज्ज्ञाची एक समिती नेमली. दोन्ही पक्षाचे लोकांना तडजोड करायला सांगितली. परंतु या समिती सभासदांमध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे शासनाने जुन्या शिवजन्म तिथीत कोणताही बदल सध्या करण्याचे नाकारून तीच शिवजन्मतिथी चालू ठेवली.

इस १९९५ - त्यानंतर २८ वर्षानंतर म्हणजे १९९५ मध्ये फाल्गुनवादी अभ्यासकांनी शासनाकडे नव्या शिवजन्मतिथीचा आग्रह धरला. त्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली.याअंती २००० साली नवीन तिथी (फाल्गुनवादी) शासनाने मान्य केली.परंतु तिथी ऐवजी तारखेला प्राधान्य देऊन १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली.

टीप:
जुलियन कालगणने प्रमाणे १९ फेब १६३० (ही कालगणना कालबाह्य असल्यामुळे आपण सध्या वापरत नाही)
ग्रेगोरियन कालगणने प्रमाणे १ मार्च १६३० (आपण सध्या हीच कालगणना दैनंदिन व्यवहारात वापरतो)


सारांश -  फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०) हा प्रवाद मांडणारी महत्त्वाची साधने म्हणजे समकालीन कवी परमानंदाचे 'शिवभारत', जेधे शकावली, शिवापुरकर देशपांडे वहीतील शकावली, तंजावर येथील बृहदीश्वर मंदिरात सापडलेला शिलालेख आणि राजस्थान मध्ये सापडलेल्या कुंडल्या .यावरून फाल्गुनवादी शके १५५१ ची तिथी अधिक विश्वासनीय मान्य केले गेले.

अर्थात हा संपूर्ण वाद , काही इतिहास संशोधकांच्या अहंकारी प्रवृत्तीचा किंवा साधनांतील उल्लेखांची तफावत यामधला होता . परंतु आजही शिवजन्माचा वाद इथेच न संपता नसून पुढे देखील एका वादाला आरंभ झालाय तो म्हणजे शिवजयंती साजरी करावी तिथी का तारखेप्रमाणे ?


|| लेखन सीमा ||
   रोहित पवार

संदर्भ - 
शिवभारत  (कवींद्र परमानंदकृत) - स.म.दिवेकर
जेधे शकावली - अ.रा.कुलकर्णी , डायमंड प्रकाशन
शिवचरित्रप्रदीप -द॰ वि॰ आपटे व सदाशिव दिवेकर, भा.इ.सं.म प्रकाशन
नरहर कुरुंदकर यांचे व्याखान (नांदेड)

शिवजयंतीचा 'इतिहास'