इस १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. या लुटीत अगणित द्रव्य महाराजांना लाभले. दुसरीकडे या घटनेने औरंगजेबाचा तिळपापड उडाला होता. खरंतर सुरतेतून मिळणारं उत्पन्न औरंगजेबाच्या बहिणीला (जहांआरा बेगम) मिळण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती. त्याकाळी सुरत व्यापाराची राजधानी होती परंतु शिवाजी महाराजांच्या दणक्याने अनेक व्यापारी सुरत सोडून चालले होते.




यावर तोडगा म्हणून औरंगजेबाने मोठ्या उदारपणे एक वर्षभर इंग्रजांना व इतर सर्व व्यापाऱ्यांना जकात माफ करण्याचा हुकुम काढला. एवढेच नाही तर पुढेही एक चतुर्थांश जकात दरसाल माफ होईल असे संकेत दिले. (बंगालला लिहलेल्या ३० एप्रिल १६६४ च्या पत्रात "आपल्या शहरांतील व्यापाऱ्यांना उत्तेजन मिळावे व झालेल्या नुकसानीची भरपाई व्हावी म्हणून एक वर्षाच्या जकाती औरंगजेबाने माफ केल्या असे लिहले आहे")


संदर्भ - शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ लेखांक ९८७

सुरत लुटीचे डॅमेज कंट्रोल


शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत रोमांचक प्रसंग म्हणजे 'आग्रा भेट'. शिवाजी महाराजांचे विश्वसनीय आणि समकालीन चरित्र म्हणजे 'शिवभारत' आणि या ग्रंथाचे रचयिते 'कवींद्र परमानंद' हे आग्रा प्रकरणात उपस्थित असल्याची राजस्थानी पत्रव्यवहारात नोंद आढळते.

त्या 'डिंगल' भाषेतील पत्राचा मराठी अनुवाद असा - "शिवाजीराजांसोबत त्यांचा एक कवी आहे 'कवींद्र कवीश्वर' ,शिवाजीराजांनी त्याला एक हत्ती , एक हत्तीण , एक हजार रुपये रोख, एक घोडा आणि पोशाख दिला. यासोबतच शिवाजीराजांनी अजून एक हत्ती देण्याचे वचन त्याला दिले आहे आणि ते वचन लवकरच पूर्ण करतील."
---------------------------
"Shivaji has a poet entitled 'kavindra kavishwar', to whom he gave male elephant, female elephant, one thousand rupees in cash, a horse & full suit. He promised to give one more elephant to the poet & he is going to give it."

‪#‎Reference‬ - Shivaji's visit to aurangzib at agra, letter 28
---------------------------
या पुस्तकाचा परिचय जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - 


‪शिवभारतकार परमानंद आणि आग्रा भेट‬

शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर यादिवशी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला.या दिवसाची आठवण म्हणून अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ठीकठिकाणी साजरा केला जातो. आज ३५० वर्षाहूनही अधिक काळ उलटला तरी 'छत्रपती शिवाजी महाराज' ह्या नावाचं गारुड महाराष्ट्रातल्या कानाककोपऱ्यात प्रत्येक माणसावर संस्कार करत आलंय.परंतु या राज्याभिषेकाचे प्रयोजन काय होते हे समजून घेण्यासाठी त्यांच्या कार्याचे स्वरूप आणि त्यामागील प्रेरणा समजून घेणे आवश्यक आहे.


शिवपूर्वकाळात हिंदुस्थानात यावनी सत्ता अधिराज्य गाजवत होत्याउत्तरेत मुघल तर दक्षिणेत आदिलशहा आणि कुतुबशहा अशा बलशाली सत्ता राज्य करत होत्याया सत्तांचे स्वरूप हे प्रामुख्याने 'लष्करीहोते त्यामुळे स्थानिकांमधे या सत्ताधीशांविषयी असंतोषाची भावना होतीअशातच एका जहागीरदाचा पुत्र या अन्य्याया विरुद्ध बंड उगारतो आणि स्थानिकांमधे 'स्व'राज्याची भावना निर्माण करतो हि गोष्ट प्रवाहाविरुद्धच होतीराज्याभिषेकाची भावना व्यक्त करताना बखरकार लिहतो कि"राजे सिंहासनारूढ झाले , ह्या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशहा मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपती जाला ही गोष्ट सामान्य जाली नाही"राज्याभिषेकाचे महत्व सांगताना जेष्ठ इतिहास संशोधक 'वा.सीबेंद्रेआपल्या 'श्रीशिवराजाभिषेकग्रंथात लिहतात किछत्रसिंहासनाच्या धर्मसिद्ध प्रतिष्ठेने हिंदवी राज्यसंस्थेला सांस्कृतिकराजकीय आणि सामाजिक श्रेष्ठ दर्जा व स्थैर्य प्राप्त होण्याचे उद्दिष्ट या राज्याभिषेकामागे होते "


राज्याभिषेक हा एक संस्कार आहे, तो आवश्यक आहेच परंतु केवळ राज्याभिषेक हि स्वराज्याची फलश्रुती नव्हे. अॅबे कॅरे हा फ्रेंच प्रवासी शिवकाळात हिंदुस्थानात येऊन गेला. चौल बंदरानजीक त्याचे एका मराठा अधिकाऱ्याशी जे संभाषण झाले ते त्याने त्याच्या प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे. तो मराठा अधिकारी सांगतो कि, "सिंधु नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश काबीज करावयाची शिवरायांची मनिषा आहे" . हे होतं शिवाजी महाराजांचं स्वप्न जे पुढे नानासाहेब पेशव्यांनी पूर्ण केले. पूर्वेकडील देशांत शिवाजी महाराज सर्वात महान राजे असून त्यांच्या गुणवत्तेची तुलना स्वीडनचा महान राजा 'गुस्तावस एडोल्फस' शी करावी लागेल असे कॅरे लिहतो. याशिवाय समकालिन पोर्तुगीज आणि इंग्रजांचा पत्रव्यवहार पाहिल्यास शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर, ज्युलिअस सीझर या महान सेनानींशी केल्याचे आढळते.

वेदमूर्ती गागाभट्टांनी शिवाजीरायांच्या मस्तकी सार्वभौमत्वाच्या धारा धरल्या. छत्र घारण करणे, नाणी पाडणे आणि नवीन शक सुरु करणे ही सार्वभौमत्वाची तीनही चिन्हे महाराजांनी अमलात आणली.
राज्याभिषेकावेळी राज्यव्यवस्थेत महत्वाचे बदल करण्यात आले. याची सुरवात केली ती भाषा शुद्धीकरणा पासून .शिवरायांनी शब्दकोश (dictionary) तयार केला हे फार कमी लोकांना माहित असेल. ३०० वर्ष यावनी राजवटीखाली स्थानिकांवर, राज्यव्यवहारात फारसी-दक्खनी भाषेचा प्रभाव पडलेला होता.यावर उपाय म्हणुन फारसी-दक्खनी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द शोधुन त्याचा एक कोश तयार करावयाची योजना शिवाजी महाराजांनी आखली. 'रघुनाथपंत हणमंते' यांना दरबारात बोलावुन राज्यव्यवहारकोश प्रकल्पाचे काम सोपवले. ठरल्यानुसार इ.. १६७६-७७ दरम्यान हा कोश निर्माण झाला. अशा कोशाची निर्मिती करणारे शिवराय हे पहिले कोशकार ठरतात.शिवरायांच स्वप्न आणि त्याचं वेगळेपण यातूनच दिसून येते.


राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी एका महत्वाकांक्षी मोहिमेला प्रारंभ केला तो म्हणजे 'दक्षिण दिग्विजय' .यावेळी चेन्नईच्या दक्षिण भागातील 'जिंजी' हा महत्त्वाचा किल्ला महाराजांनी स्वराज्यात आणला. जिंजी ते रायगड या परतीच्या प्रवासात 'समोत्तिपेरूमल' देवालया नजीक महाराजांचा मुक्काम होता. बहमनी सत्तांनी उध्वस्त केलेल्या या मंदिराची पुनर्प्रतिष्ठापना शिवाजीराजांनी केली. याठिकाणी त्रिपुरी पौर्णिमेस भव्य दीपोत्सवाची प्रथा महाराजांनी पुन्हा सुरु केली जी दीर्घकाळ बंद पडली होती. हा दीपोत्सव आजही साजरा केला जातो. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघी दक्षिण काबीज करायला निघालेल्या औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केले. यावेळी जिंजीच्या किल्ल्याने शिवपुत्र राजाराम महाराजांना तब्बल ८ वर्षे आश्रय दिला. शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयाची हि फलश्रुतीच म्हणावी लागेल.

स्त्रीचा बदअमल केला म्हणून रांझ्याच्या पाटलाला तडक चौरंगाची शिक्षा सुनावणारे शिवराय , जिवाजीपंताने कामात दिरंगाई केल्यावर ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केली जाणार नाही असे खडसावणारे शिवराय, रयतेच्या पिकाच्या देठासही धक्का लावू नका अशी सैन्यास तंबी देणारेही शिवराय. अशा अनेक विविध पैलूंनी नटलेले शिवाजी महाराजांचे चरित्र अद्वितीयच आहे. परंतु आज शिवचरित्रातुन प्रेरणा घेण्यापेक्षा समाजात जातीभेद पेरला जातोय, दुर्गसंवर्धनापेक्षा पुतळ्यांना महत्व दिले जाते , सोशल मिडियावर मांडला जाणारा इतिहास शहानिशा न करता खरा मानला जातो, हि खरी शोकांतिका. आज आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतीय अस्मितेचा जागर जिद्दीने केला जातोय मग तीनशे वर्षापूर्वी राज्याभिषेकाच्या निमित्ताने अस्मितेचे अग्निपुष्प फुलले त्याची आठवण आजच्या दिवशी करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

बहुत काय लिहावे
- रोहित पवार

शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने...


२० व्या शतकात इतिहासकरांनी राष्ट्रसेवेच्या उद्देशाने इतिहास संशोधनात मोलाची कामगिरी केली. परंतु इतिहास म्हणले कि वाद विवाद आलेच. अशीच हि गोष्ट आहे सरदेसाई आणि शेजवलकर यांच्यातील.बडोद्याच्या 'भारत गौरव ग्रंथमाला' च्या संपादकांनी भारतातील कर्तुत्ववान व्यक्तींची चरित्रे लिहावयाचा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी सरदेसाईंना नानासाहेब पेशव्यांचे चरित्र लिहायची विनंती केली.


सरदेसाईंनी ते चरित्र लिहण्याचे मान्य केले. त्यांची मराठी रियासत संपादित असल्याने त्यांच्यासाठी हे नवीन काम नव्हते. पण तरीही नव्याने लिहलेल्या पुस्तकाचे संपादन एका तरुण अभ्यासकाला दिले. ते तरुण म्हणजे त्र्यं.शं. शेजवलकर. शेजवलकरांचा पेश्व्यांबद्दलचा दृष्टीकोन सरदेसाईंच्या अगदी विरुद्ध होता. सरदेसाईंना हि गोष्ट चांगली माहित होती.सरदेसाईंची अशी धारणा होती कि या मतमतांतरामुळे लोकांना स्वतःची मते मांडावीशी वाटतील, ऐतिहासिक लेखन करण्यास लोक प्रवृत्त होतील. म्हणून नानासाहेबांच्या त्या चरित्रात शेजवलकरांनी लिहलेल्या टीकात्मक प्रस्तावनेचा पुस्तकामधे मुद्दाम समावेश सरदेसाईंनी केला.


त्याकाळात इतिहासकरांचे वाद कधी कधी विकोपालादेखील जात, परंतु इतिहासात चांगली सुधारणा हा त्यामागील हेतू स्पष्ट होता. स्तुती आणि टीका या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करण्याची बुद्धी आणि मनाचा मोठेपणा काय असतो याचे सुंदर उदाहरण म्हणजे सरदेसाई.

गोष्टी इतिहासकरांच्या !


इसवी सनाच्या सातव्या शतकात परकीय शक्तींचे भारतात आगमन झाले. यामध्ये प्रामुख्याने अरब आले, नंतर तुर्क, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज आले. बाराव्या शतकात 'अल्लाउद्दिन खिल्जी' याने महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांचा गरुडध्वज उध्वस्त केला, त्यामुळे पुढची सुमारे ३०० वर्ष यावनी राजवटींखाली जनता भरडून निघाली. यादरम्यान फार्शी शब्दांचा वापर मराठी भाषेत होऊ लागला. मराठी भाषेत फ़ार्सी शब्दांचा सुळसुळात झालेला होता. मुळ संस्कृतप्रचुर भाषा विलयास चालली होती. 

सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेश आणि संस्कृती रक्षणार्थ महाराष्ट्र राज्याची स्थापना केली.परंतु शिवकाळातही दैनंदिन व्यवहारात फारसी-दक्खनी भाषेचा प्रभाव पडलेला होता. लोकांनीतर आपल्या मुलांची नावेसुद्धा रुस्तुमराव, सुल्तानराव ठेवायला सूरवात केली होती. यावर उपाय म्हणुन राज्यव्यवहारात आढळुन येणार्या फारसी-दक्खनी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द शोधुन त्याचा एक कोश तयार करावयाची योजना शिवाजी महाराजांनी आखली. 

राज्यव्यवहार कोश सुपूर्द करतानाचे काल्पनिक चित्र , सौजन्य - पराग घळसासी


इ.स १६७४ साली हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना करणारा मंगल सोहळा पार पडला,शिवरायांचा राज्याभिषेक झाला. यानंतर त्यांनी 'रघुनाथपंत हणमंते' यांना दरबारात बोलावुन राज्यव्यवहारकोश प्रकल्पाचे काम सोपवले. यापुर्वी म्हणजे इस १६६५ साली पुरंदरतहा दरम्यान रघुनाथपंत हणमंते यांना शिवाजीराजांनी 'पंडितराव' हा किताब दिला होता. योजना ठरल्यानुसार इ.स. १६७६-७७ दरम्यान हा कोश निर्माण झाला. रघुनाथपंत दक्षिणदिग्विजय मोहिमेत गुंतले असल्याने त्यांनी हे काम आपला हस्तक 'धुंडीराज लक्ष्मण व्यास' याकड़े सोपवले. 

शिवाजी राजांनी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करण्यासाठी दिलेली आज्ञा आणि त्याबद्दलचा राज्यव्यवहारकोश मधील उपोद्घात आलेला उल्लेख असा, 
कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थं यवनवचनैर्लुप्तसरणिम् |
नृपव्याहार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्
नियोक्तोभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ||

अर्थ - या पृथ्वीतलावरून म्लेंच्छांचा पूर्ण उच्छद केल्यानंतर सूर्यवंशाला ललाभूत ठरलेल्या त्या छत्रपती शिवाजी राजांनी यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राजव्यवहार पध्दतीचा संस्कृत भाषेतून प्रसार करण्यासाठी (रघुनाथ) पंडिताची नियुक्ती केली.

'द ग्रेट मुघल' या ग्रंथाचा लेखक अर्ली इब्राहीम लिहतो कि, A Significant aspect of Shivaji's rule was his attempt to revive ancient Hindu political tradition and court conventions to introduce Marathi in place of Persian as the court language. He revived Sanskrit administrative nomenclature and compiled a dictionary of official terms- the Rajya Vyavhar Kosh - to facilitate the change over.

सुमारे १३०० पेक्षा अधिक शब्दांचा एक कोश तयार झाला. राज्यव्यवहार कोशाच्या दहा सर्गात १३८० फार्सी- दख्खनी उर्दू शब्द आले असून, त्यांच्या पर्यायी संस्कृत प्राकृत शब्द सुचविले आहेत. उदा. गुलाम-दास, चोपदार-दण्डधर, चाकर-सेवक , गरम-उष्ण. आपली मराठी संस्कृती जपली जावी या उद्देशाने शिवाजी महाराजांनी हा कोश रचला, तसेच यादरम्यान 'शिवाकौदर्य' आणि 'करणकौस्तुभ' असे संस्कृत ग्रंथ देखील लिहून घेतले. राज्यव्यवहारकोशाची निर्मिती करणारे शिवराय हे पहिले कोशकार ठरतात. शिवरायांच स्वप्न आणि त्याचं वेगळेपण यातून दिसून येते.


-रोहित पवार


संदर्भ: 
राज्यव्यवहारकोश - संपादक : अ.दा. मराठे
स्वधर्म - निनाद बेडेकर
The Great Mughal- Arlie Embrahim
चित्र सौजन्य - पराग घळसासी


शिवरायांचा एक अपरिचित प्रकल्प



 कालगणना हि सूर्य किंवा चंद्रावर आधारित असते. अगदी पुरातन काळापासून भारतात चांद्रमास आणि सौरवर्षावर आधारित हिंदू कालगणनेचा वापर भारतात होत आला आहे. जगभारत अनेक संस्कृती उदयास आल्या आणि कालगणना निश्चिती करण्यासाठी आपापल्या सोयीनुसार प्रत्येक संस्कृतीने कालनिर्णय ठरवला. इसवीसनपूर्व काळात रोमन साम्राज्य अस्तित्वात होते, त्यांनी वर्षाचे ३५५ दिवस कॅलेंडर वापरात आणन्यास सुरवात केली. हे कॅलेंडर देखील चांद्रमासावर आधारित होते.परंतु एका सौरवर्षात ३६५ दिवस असतात हे रोमन लोकांना परिचित होते. त्यावेळी प्रत्येक वर्षी १० दिवसांचा फरक पडत होता. त्यामुळे हा फरक भरून काढण्यासाठी रोमन लोकांनी दर तीन वर्षांनी एक अधिक मास (३० दिवस) घेतला. परंतु हे करूनसुद्धा भौगोलिकरित्या हा समतोल साधण्यात बराच गोंधळ उडाला.  आणि म्हणूनच यातून मार्ग काढण्यासाठी 'ज्युलिअस सीझरने' पूर्वीच्या कालगणनेत महत्वाचे फेरबदल करून इसवीसनपूर्व ४६ साली सुधारणेचा एक हुकूमनामा काढला. यालाच ज्युलियन कॅलेंडर म्हणतात. 



 आता यात नेमके काय बदल केले ते पाहूयात, पृथ्वीला सूर्याभोवती भ्रमण पूर्ण करण्यासाठी ३६५.२५६४ (अंदाजे ३६५ ¼) दिवस लागतात. म्हणून ज्युलियसने  यावर एक युक्तिवाद करून १२ महिन्यांची वाटणी करून काही महिन्यांना ३० तर काहींना ३१ दिवस अशी विभागणी केली. यात फेब्रुवारीला मात्र २८ दिवस नेमून दिले. आता ३६५ दिवस समतोल झाले असून सुद्धा ०.२५ दिवसांचा जो फरक दरवर्षी येणार होता त्यासाठी दर चार वर्षांनी येण्यार्या फेब्रुवारी महिन्यात १ अधिक करून ३६६ दिवसांचे वर्ष ठरवण्यात आले. (३६५+३६५+३६५+३६६ = ३६५.२५). इसवीसनपूर्व १ जानेवारी ४५ या वर्षी हे कॅलेंडर वापरात आणले गेले.तर हा झाला ज्युलियन कॅलेंडरचा इतिहास.

आता वळूयात 'ग्रेग्रोरीयन कॅलेंडरकडे' जे आपण सध्या वापरत आहोत.  १६व्या शतकात हे सौरकॅलेंडर वापरात का आणले गेले याचे मुख्य कारण म्हणजे सौरकालगणना आणि ज्युलियन मधला छोटासा फरक.
मूळ संपतीय वर्षात एक वर्ष हे ३६५.२४२२ दिवसांचे असते तर ज्युलियन कॅलेंडर नुसार वर्ष ३६५.२५ दिवसांचे. यामध्ये ०.००७८ दिवसांचा प्रत्येक वर्षी फरक येऊ लागल्याने, दर १२८ वर्षानंतर ज्युलियन कॅलेंडर मोजताना १ दिवसाची भर पडू लागली. इसवी पूर्व ४५ पासून हा फरक मोजायचा राहून गेला होता. १६व्या शतकात पोप ग्रेगरी १३ यांनी ज्युलियन कॅलेंडर मध्ये सुधारणा सुचवून  इस १५८२ साली ग्रेग्रोरीयन कॅलेंडर अस्तित्वात आणले. ज्यात १५८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात १० दिवस कमी केले. (४ ऑक्टोबर नंतर १५ ऑक्टोबर चा दिवस मोजला गेला) आणि लीप वर्षासंबंधी काही त्रुटी दूर केल्या. १७५२ साली हि कालगणना ब्रिटन आणि ब्रिटीशांचे साम्राज्य असलेल्या देशात स्वीकारली गेली.


शिवाजी महाराजांना विश्वव्यापक बनवायचे असेल तर शिवजयंती तारखेने करायला हवी हा अट्टहास काही शिवप्रेमींचा आहे ( शिवजयंती तारखेने करावी या मताचा मी देखील आहे ) परंतु १९ फेब्रुवारी हा शिवजयंती साजरी करायचा दिनांक ज्युलियन कालगणनेप्रमाणे आहे हे कोणी सहसा लक्षात घेताना दिसत नाही. यासाठी वरील माहितीप्रमाणे कालमापणाचे सोप्पे गणित असे कि, इस १७५२ च्या आधी ज्या नोंदी (ज्युलियन प्रमाणे ) आहेत त्यांचा ग्रेग्रोरीयन दिनांक काढण्यासाठी नोंदीच्या तारखेत १० दिवस सरसकट वाढवावेत. यानुसार १९ फेब्रुवारी मध्ये  १० दिवस वाढवले कि ग्रेग्रोरीयन दिनांक येतो १ मार्च. (लीप वर्ष आले असेल तर हा दिनांक २९ फेब्रुवारी धरावा). 


शिवजयंती साजरी कधी करावी ? तारखेने कि तिथीने ? हा ज्याचा त्याचा प्रश्न. शिवजयंतीचा वाद वाढवण्यासाठी हा लेख लिहला नसून , कालमापणाचा असाही उपयोग दैनंदिन इतिहास अभ्यासात करता येतो यासाठी हि बाजू मांडणे आवश्यक वाटले. बाकी आपण सुज्ञ आहात.

|| लेखनसीमा ||
- रोहित पवार


संदर्भ -
मला उत्तर हवय - मोहन आपटे
संशोधकाचा मित्र - ग.ह.खरे


इतिहासाची कालगणना



'ही गोष्ट सुरु होते १६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा, पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुतीतला प्रचंड ऐवज हरवला ! कुठे गडप झाला हा खजिना?' असं कथानक घेऊन एक उत्कृष्ट कादंबरी रचली गेली जी सद्ध्या चर्चेत आहे. पण इतिहास याबद्दल काय सांगतो याचा 'शोध' अस्सल साधनातून आपण घेऊया.


लुट (काल्पनिक चित्र)


सतराव्या शतकात सुरतेची बाजारपेठ अतिशय समृद्ध आणि कोट्याधीश व्यापाऱ्यांची पंढरीच. हीच सुरत यापूर्वीही शिवाजी महाराजांनी इस १६६६ साली लुटून बरीच संपत्ती स्वराज्यात दाखल केली होती. यानंतर १६७० साली शिवाजीराजांनी पुन्हा सुरतेवर हल्ला चढवला. प्रथम महाराज कल्याणला आले तेथून पंधरा हजाराच्या फौजेनिशी सुरतेत थडकले. २ ऑक्टबर ते ५ ऑक्टोबर असे तीन दिवस सुरतेची धूळधाण केली. या लुटीत शिवाजी महाराजांना एकूण ६६ लाख रुपये मिळाले.
या लुटीदरम्यान शिवाजी महाराजांनी एकीकडे सुरतेतल्या डच, फ्रेंच आणि इंग्रज वखारिंना अभय दिले तर दुसरीकडे मुघल अधिकाऱ्यास पत्र लिहले कि, "दरसाल १२ लाख रुपये न द्याल तर पुन्हा पुढील वर्षी उरलेले शहर जाळून टाकेन". सुरत लुटीने मुघलांना चांगलाच धक्का बसला. लुटीच्या तिसऱ्या दिवशी (५ ऑक्टो) महाराज अचानक सुरत सोडून गेल्याची बातमी पसरली.
सुरतेहून महाराज पेठ - बागलाणमार्गे मुल्हेरकडे (नाशिक जिल्हा) निघाले. साल्हेर-मुल्हेरवरून चांदवडास येऊन कंचनमंचन घाटाने कोकणात उतरणार असे मराठ्यांच्या हालचालीवरून दिसते . पंधरा हजाराच्या फौजेनिशी महाराज चांदवडनजीक आले. मुघल सेनापती 'दाऊदखान कुरेशी' याने मराठ्यांच्या सैन्याला गाठले आणि १७ ऑक्टोबर १६७० रोजी घनघोर युद्ध होऊन त्यात मुघलांचा पराभव झाला.तीन हजार मुघल मारले गेले. हि लढाई 'वणी-दिंडोरीची लढाई' म्हणून प्रसिद्ध आहे. महाराजांना सुरतहून आणलेल्या लक्ष्मीसह अडविण्याचा मोगली प्रयत्न पार धुळीस मिळाला. उघड्या मैदानावर देखील विजय प्राप्त करू शकतो हा मराठ्यांचा विजयिष्णू भाव जागृत होऊन त्या भागातील अलंग,कुलंग,त्रिंगलवाडी हे गडहि स्वराज्यात दाखल झाले. विजयी शिवाजीराजे नाशिकमार्गे सहीसलामत हरिश्चंद्रगडा जवळील 'कुंजरगडावर' येऊन पोहोचले आणि यानंतर ऑक्टोबर अखेरीस रायगडावर पोहोचले.
हि सर्व हकीगत पाहता सुरत लुटीचा खजिना सुखरूप स्वराज्यात पोहोचला असे म्हणावयास हरकत नाही. मुघलांचा हेतू होता शिवाजीराजांना अडवणे आणि महाराजांचा हेतू होता सुरतेहून आणलेला खजिना सुरक्षित घेऊन जाणे, आणि यात शिवाजी महाराज यशस्वी झाले. लुटीचा खजिना हा खुश्कीच्या (जमिनीवरून) मार्गाने आणला गेला . ऑक्टोबर दरम्यान समुद्रामार्गे मराठी आरमार पाठवल्याची अथवा अडवल्याची एकही नोंद नाही.याउलट डच, पोर्तुगीज आणि इंग्रजांचे आरमार मराठ्यांना दबकून होते असे त्यांच्या पत्रव्यवहारातून दिसते. सुरत ते रायगड प्रवासात कुंजरगड, अलंग,कुलंग,त्रिंगलवाड हे गड स्वराज्यात दाखल झाल्याने लुटीतला काही ऐवज या गडांच्या शिबंदीसाठी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा खजिना कुठेही गायब न होता स्वराज्यात दाखल झाला हे वरील पुराव्यांवरून दिसून येते.
- रोहित पवार
संदर्भ :
जेधे शकावली
English Records on Shivaji
शिवकालीन पत्रसार संग्रह
समग्र सेतूमाधवराव पगडी (खंड२)
शककर्ते शिवराय - विजय देशमुख
मराठी रियासत - सरदेसाई

सुरतेची लुट आणि खजिना


पानिपतचे महायुद्ध झाले ते अफगाणी अहमदशहा अब्दाली आणि मराठा सदाशिवराव भाऊ यांच्यात. 'अहमदशहा अब्दाली' वयाच्या १६ व्या वर्षीपासूनच इराणचा बादशहा 'नादिरशहाचा' गुलाम होता. नादिरशहाची त्यावर मर्जी होऊन तो लवकरच 'यसवाल' (वयक्तिक अधिकारी) झाला.
पुढे १७३९ साली नादिरशहाने दिल्लीवर स्वारी केली त्यावेळी अब्दालीदेखील त्याच्यासोबत होता. या दरम्यान मुघलांचा दक्खनेतील सुभेदार असलेल्या 'निजाम-उल-मुल्कची' नजर या अब्दालीवर पडली. मुखसामुद्रिक (Facereading) अवगत असणाऱ्या निजाम-उल-मुल्कने भाकीत केले कि, "अब्दालीच्या शरीरावर राजलक्षण आहेत, हा लवकरच बादशहा होईल" ! बादशहा नादिरशहाने हे ऐकल्यावर अब्दालीला बोलवून कट्यारीने त्याच्या दोन्ही कानांचा तुकडा काढला आणि म्हणाला , " तू बादशहा झालास कि यामुळे तुला माझी आठवण होत राहील".

संदर्भ :
*Solstice at Panipat -Uday Kulkarni, P28
*Ahmad Shah Durrani - Ganda Singh , P19
* मूळ संदर्भ तारीख-इ-अहमदशाही 2b

(कुरूप) अहमदशहा अब्दाली



इंग्रज हिंदुस्थानात व्यापारासाठी आले. पुढे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली पण कंपनीची अरेरावी खटकु लागल्याने इंग्लड मधील व्यापार्यांनी 'न्यू इंग्लिश कंपनी' सुरु केली. याचबरोबर जुन्या ईस्ट इंडिया कंपनी बंद करण्यात यावी यासाठी ३ वर्षाची मुदत देखील देण्यात आली. आता  या नव्या कंपनिला हिंदुस्थानात मोगल बादशाह कडून पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व  सवलती मिळाव्यात म्हणुन इंग्लडच्या राजाने वकील म्हणुन 'सर विलियम नॉरिसला' बादशाह औरंगजेबाकडे हिंदुस्थानात पाठवले. पुढे दोन्ही कंपन्या एकत्र झाल्याने नॉरिसची वकीली वाया गेली, पण भेटी दरम्यान त्याने दैनंदिनी टिपुन ठेवली.
२५ जानेवारी १७०१ रोजी नॉरिस सुरतेहुन औरंगबादकडे निघाला. २२ फेब १७०१ रोजी शहागड (औरंगबाद) गावी आला. याठिकानी सुरतेच्या एका सुप्रसिद्ध व्यापार्याची वखार होती तिथे मराठयांनी धमाकुळ घातला होता. "मोठेमोठे मोगल अधिकारी प्रवास करण्यास घाबरत, इतका त्यांना मराठयांचा धाक वाटत" ,असे त्याने नमुद केले आहे.
मराठयांचे सातारा,पन्हाळगड इत्यादि किल्ले जिंकन्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हपुरीहुन मिरज मार्गे पन्हाळगडाकडे प्रस्थान केले होते. औरंगजेबच्या प्रवासाची ही माहिति जमा करुन त्याच्या मागाहुन नॉरिस २७ मार्च १७०१ रोजी मिरजेस पोहोचला. बादशाह औरंगज़ेब नुकताच इथे राहुन गेला होता. त्याच्या छावणीची जागा नॉरिसने पाहिली. छावणीभोवतीचा संरक्षण 'खंदक' पाहुन नॉरिसला हसु आले. तो म्हणतो, 'हा कसला खंदक ! सहा-सात वर्षाचे मुलसुद्धा हा खंदक सहज ओलंडु शकेल.
संदर्भ : Norris Embassy to Aurangjeb - Haridaas

मराठ्यांची धास्ती आणि औरंगजेबचा खंदक !